या सरकारकडे भावनाचा दुष्काळ आहे. कृषिमंत्री आले नाही, मुख्यमंत्री आले नाही. हे उत्सवी सरकार आहे, उत्सवमग्न सरकार आहे.
मुंबई, 02 ऑक्टोबर : ‘काँग्रेस-राष्ट्रवादीवर शिंदे आज टीका करतात, पण महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी दिल्लीत काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्याशी संधान बांधले होते. 15 ते 20 आमदारांसह ‘येतो’, गृहमंत्रिपदासह उपमुख्यमंत्रिपद द्या ही चर्चा त्यांनी सुरू केली होती’ असा गौप्यस्फोट शिवसेनेनं केला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. याच मुद्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. ‘काँग्रेस-राष्ट्रवादीवर शिंदे आज टीका करतात, पण महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी दिल्लीत काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्याशी संधान बांधले होते व तेव्हाही त्यांच्या मनात वेगळे विचार होते. सौदेबाजी फिसकटली इतकेच, असे पुराव्यासह सांगणारे अनेक लोक आजही त्यांच्या अवतीभोवती आहेत. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनीही आता एकनाथ शिंदे हे सत्तेसाठी किती उतावीळ झाले होते याचा स्फोट केला आहे. ‘‘भाजप-शिवसेना ‘युती’चे सरकार असताना व फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे एक शिष्टमंडळ काँग्रेस नेत्यांना भेटले व नव्या सरकार स्थापनेचा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता (2014). त्या शिष्टमंडळात स्वतः एकनाथ शिंदे होते’’, असे चव्हाण यांनी सांगितले. म्हणजे तेव्हा शिंदे यांनी काँग्रेसबरोबर जाण्यास विरोध केला नव्हता व काँग्रेसबरोबर गेल्याने ‘ठाकरे-दिघे’ यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा वारसा मोडून पडेल असे त्यांना वाटले नव्हते. त्याच काळात त्यांनी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी संधान बांधले होते व 15 ते 20 आमदारांसह ‘येतो’, गृहमंत्रिपदासह उपमुख्यमंत्रिपद द्या ही चर्चा त्यांनी सुरू केली होती, असे ठामपणे सांगणारे आहेत. त्याला आजही प्रत्यक्षदर्शी आहेत, असा खुलासाच शिवसेनेनं केला. (शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चा जोरात, मिलिंद नार्वेकर म्हणतात, ‘मी तर भाग्यवान…’) ‘शिंदे काँग्रेसशी चर्चा करीत आहेत ही पहिली खबर (एफआयआर) तेव्हा भाजपनेच उद्धव ठाकरे यांच्याकडे नोंदवली होती. ‘ईडी’च्या भीतीने शिंदे हे भाजपमध्ये गेले. कारण ठाणे महानगरपालिका, समृद्धी महामार्ग, नगरविकास खाते या माध्यमांतून पैसाच पैसा. त्या पैशातून सत्ता. सत्तेतून पुन्हा पैसा, या दुष्टचक्रात ते पूर्ण अडकले. नाही तर शिंदे आदमी काम का था असे उघड बोलले जाते. मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा असणे वेगळे व लालसा असणे वेगळे. शिंदे हे लालसेचे बळी ठरले’ अशी टीकाही शिवसेनेनं केली.