मुंबई, 16 सप्टेंबर : मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थोडा विश्रांती घेण्याची शक्यता आहे. दरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्रासह राज्यात पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर कमी होणार आहे. काही भागांत पुढील एक ते दोन दिवस पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. (Mumbai Pune Rain Alert) तुरळक भागांतच पाऊस होण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे मूळ जागेवर सरकतानाच अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा झाल्याने राज्यात गेल्या आठवड्यात अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली.
मागच्या चार दिवसांपासून झालेल्या पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने नागरिकांची उडालेली तारांबळ थांबली आहे. गुरुवारी (15 सप्टेंबर) मुंबईसह कोकणात बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तसेच आज पहाटेपासून मुंबईतील काही भागात जोरदार पाऊस झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात महाबळेश्वरसह काही भागांत, तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि विदर्भात अकोला, अमरावती आदी भागांत हलक्या सरींची नोंद झाली.
हे ही वाचा : मुंबई-पुणे प्रवास पुन्हा महागण्याची शक्यता, टोल तब्बल इतक्या टक्क्यांनी वाढणार?
पुढील एक ते दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा आदी जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या काळात राज्यात तुरळक भागांत विजांच्या कडकडाटात हलक्या पावसाची शक्यता आहे.
वसई-विरारमधील रस्ते पुन्हा जलमय ..
नालासोपारा, वसई-विरारमध्ये पहाटे पासून पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. नालासोपारा पूर्वेकडील गाला नगर, जया पॅलेस, तुळींज रोडवरील रस्त्यावर एक ते दीड फूट पाणी साचले आहे. गालानगर रोडवरील उभे असलेले वाहनेही साचलेल्या पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जर हा पाऊस असाच सुरु राहिला तर वसई विरारमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.