मुंबई, 07 ऑगस्ट : मागच्या चार दिवसांपासून मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.राज्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने ओढे, नाल्याना अचानक पाणी वाढले होते. (Monsoon Maharashtra Rain) आज (ता. 07) दक्षिण कोकण व लगतच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तर मुंबई आणि पुण्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
मान्सूनची आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला आहे. राजस्थानच्या विकानेरपासून पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. याचबरोबर झारखंड, कर्नाटकच्या काही भागात तसेच राजस्थानमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दक्षिण भारतात पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांची स्थिती कायम असल्याने पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : एसटी बसमध्ये घंटी वाजवणाऱ्या दोरीने गळफास घेऊन चालकाची आत्महत्या, धुळे आगारातली घटना
वायव्य बंगालच्या उपसागरात रविवारपर्यंत (ता. ७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. आज (ता. ६) कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासह कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, तर विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
जोरदार पावसाचा इशारा
(ऑरेंज अलर्ट) : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर, ठाणे, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.
विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर
हे ही वाचा : बलात्कार आणि जीवे ठार मारण्याची धमकी प्रकरण, शिवसेनेच्या केदार दिघेंना सर्वात मोठा दिलासा
राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व ३१४ गावे प्रभावित झाली आहेत. ८३ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११६ नागरिकांना जीव गमावला आहे, तर २३१ प्राणी दगावले आहेत. आतापर्यंत पावसामुळे ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ८६ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.