मुंबई, 17 ऑगस्ट : राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) आणि आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्या आहेत. रश्मी शुक्ला यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर 10 मिनिटांनी मोहित कंबोज फडणवीसांच्या बंगल्यावर गेले. रश्मी शुक्ला आणि मोहित कंबोज यांची फडणवीस यांच्याशी संयुक्त भेट झाली नाही. पण या भेटीगाठींमुळे राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. कालच मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याबाबत ट्वीट करून खळबळ उडवून दिली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर महाविकासआघाडी सरकार असताना गंभीर आरोप करण्यात आले होते. 2019 विधानसभा निवडणूक आणि सत्तास्थापनेदरम्यान रश्मी शुक्ला यांनी नेत्यांचे फोन टॅप केले, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. महाविकासआघाडी सरकारने याप्रकरणी रश्मी शुक्ला यांना आरोपीही केलं. रश्मी शुक्ला या सध्या हैदराबादमध्ये नियुक्तीवर आहेत. काय म्हणाले मोहित कंबोज? राष्ट्रवादीचा एक मोठा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटेल, असं ट्वीट कंबोज यांनी केलं होतं. तसंच सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी व्हावी, ज्याची फाईल परमबिर सिंग यांनी 2019 साली बंद केली होती, असंही कंबोज म्हणाले.
अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊत या नावांनंतर पाचव्या नावाच्या ठिकाणी कंबोज यांनी गाळलेली जागा ठेवली होती. आपला स्ट्राईक रेट 100 टक्के असल्याचंही ते या ट्वीटमध्ये म्हणाले होते.