फोटो क्रेडिट - लोकमत
मुंबई, 11 नोव्हेंबर : केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. नांदेडच्या देगलुरमध्ये भारत जोडोचं आगमन झालं आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत 5 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही यात्रा नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यांमधून जाणार आहे. याचदरम्यान, भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रातील एका तरुणीची सर्वत्र चर्चा होत आहे. आतिषा पैठणकर असे या तरुणीचे नाव आहे. ही तरुणी नाशिक रोड येथील रहिवाशी आहे. या तरुणीची कथा ही वेगळीच आहे. तिला तीन वर्षांच्या प्रयत्नांनंतर एअर इंडियात नोकरी मिळाली. यानंतर 7 सप्टेंबरला तिची ज्वाईनिंग होती. मात्र, याच दिवशी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात होणार होती. त्यात तिने नोकरीवर न रुजू होता भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत कन्याकुमारीपासून 118 भारतयात्री सहभागी झाले आहेत. त्यात या तरुणीचा समावेश आहे. आतिषा ही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. तिच्या आई-वडील, भाऊ बहिण असा परिवार आहे. तिचा भाऊ शिक्षण घेत आहे तर मोठी बहीण ही वर्क फ्रॉम होम करते आहे. आतिषाने इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग केले आहे. आतिषाने तब्बल तीन वर्षे एअर इंडियातील नोकरीसाठी प्रयत्न केले. यानंतर एअर इंडियाने तिची मुलाखत घेतल्यानंतर 7 सप्टेंबरला तिला नोकरीवर रुजू होण्याचे पत्र पाठविले होते. यासोबतच इकडे आतिषाने भारत जोडो यात्रेत भारतयात्रीसाठी म्हणूनही मुलाखत दिली होती. हेही वाचा - Video : राहुल गांधींसह सुप्रिया सुळेंचीही जादू, भारत जोडो यात्रेला गर्दीच गर्दी नोकरीवर रुजू होण्यासाठी ती 6 सप्टेंबरला कोलकाता येथे जायला निघाली होती. मात्र, मुंबई विमानतळावर आल्यावर तिला नोकरी की भारत जोडो यापैकी कशाची निवड करायची? याबाबत ती द्विधा मन:स्थितीत होती. अखेर तिने नोकरीवर पाणी सोडले आणि भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आई-वडिलांना दिला शब्द - आई-वडिलांना ही बाब कळाल्यानंतर त्यांच्या रोषाचा सामनाही तिला करावा लागला. मात्र, एक महिन्यात परत येऊन पुन्हा नोकरी करेल, असा शब्द तिने दिला. यानंतर आई वडिलांनी दिलेल्या होकारानंतर आतिषाने थेट कन्याकुमारी गाठले. याबाबत आतिषा काय म्हणाली - नव्या भारतासाठी भारत जोडो यात्रा महत्त्वाची आहे. या यात्रेच्या माध्यमातून देशभरातील तरुणाईशी संवाद साधण्याची संधी मिळाली. तसेच त्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी समजल्या. अनुभवाची ही शिदोरी पुढील आयुष्यात मोलाची ठरणार आहे, असे आतिषा म्हणाली आहे.