मुंबई, 23 जुलै : जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने मागच्या दोन दिवसांत थोडी उसंत घेतली होती. परंतु पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार असून आज (दि.23) उद्या रविवारी पावसाचा प्रभाव थोडा जास्त राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. विदर्भात आज-उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्याच्या काही भागातही पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. (Maharashtra Rain News)
विदर्भात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. तर विदर्भातील वाशिम, अकोला, भंडारा, नागपूर, अमरावती, वर्धा, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे ही वाचा : shiv sena saamana Editorial : शिवसेनेकडून भाजपचे ‘या’ कारणासाठी कौतुक, भाजपच्या शिडीवर ठेवलेले हे पहिले पाऊलच…
गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. परंतु पावसाचा अंदाज असुनही मुंबईत मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. मुंबई आणि उपनगरात ढग साचत असले, तरी प्रत्यक्षात पाऊस हुलकावणी देत आहे.
दरम्यान २३ आणि २४ जुलै रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हे ही वाचा : सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण वैध ठरवल्यानंतर निवडणूक आयोगाचे 13 महापालिकांना महत्त्वाचे आदेश
या जिल्ह्यांना इशारा
२३ जुलै : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.
२४ जुलै : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक, नंदुरबार, जळगाव.