मुंबई, 25 नोव्हेंबर: देशभरात कोरोना व्हायरसच्या (Corona virus) संसर्गाच्या बाबतीत मोठी घट होताना दिसत आहे. सध्या दररोज देशभरात सरासरी 10 हजार नवीन प्रकरणे समोर येत आहेत. पण कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. यामागे लोकांचा निष्काळजीपणा असल्याचं दिसून येतेय. त्यातच महाराष्ट्रातून एक मोठी बातमी समोर येतेय. राज्यात सुमारे 92.5 लाख लोकांनी अद्याप लसीचा (Covid-19 Vaccine) दुसरा डोस (Second Dose) घेतलेला नाही. राज्य सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 77 लाख लोकांनी कोविशील्डचा दुसरा डोस घेतलेला नाही. तर कोवॅक्सिन घेणारे 15 लाख लोक अजून दुसरा डोस घेण्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. हेही वाचा- Breaking News: शक्ती मिल गँगरेप प्रकरणातील आरोपींची फाशी रद्द ज्यांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही, त्यांची यादी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. ‘हर घर दस्तक’ मोहिमेअंतर्गत त्यांना लस घेण्यास सांगितलं जात आहे. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितलं की, लोकांनी लक्षात ठेवावं की लसीचा पहिला डोस त्यांना व्हायरसशी लढण्यासाठी तयार करतो. तर दुसरा डोस अँटीबॉडी बनवतो. त्यामुळे दुसऱ्या डोसकडे दुर्लक्ष करू नये. 39% लोकांनी लस घेतली महाराष्ट्रात आतापर्यंत 18 वर्षांवरील 39 टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर 78% लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. दिवाळीत लाखो लोक राज्याबाहेर गेल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत, अनेकांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही. बरेच लोक विसरले. सध्या देशात कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याचं म्हटल्यानं काही लोकांनी या लसीकडे दुर्लक्ष केलं. लसीचा डेटा अलीकडेच केंद्र सरकारनं सांगितलं होतं की, 12 कोटी लोकांनी अद्याप लसीचे दोन्ही डोस घेतलेले नाहीत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितले की, बुधवारी देशात कोविडविरोधी लसीच्या डोसची संख्या 119 कोटींच्या पुढे गेली आहे. बुधवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत लसीचे 78 लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत अंतिम अहवालाच्या संकलनासह दररोज लसीकरणाचा आकडा वाढण्याची अपेक्षा आहे, असे मंत्रालयानं म्हटलं आहे. 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरण मोहीम सुरू झाली.