04 फेब्रुवारी : दख्खनचा राजा अशी ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र जोतिबाच्या खेट्यांना आजपासून सुरवात झाली आहे. 30 मार्चला होणाऱ्या चैत्र यात्रेच्या पूर्वी या खेट्यांना मोठे महत्त्व आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकही या खेट्यांच्या दिवशी जोतिबाच्या दर्शनासाठी येतात आणि आजच्याच रविवारपासून या खेट्यांना सुरुवात झाली आहे. मुख्य चैत्र यात्रेच्या पूर्वी रविवारी ज्योतिबाचे दर्शन घेणे याला मोठे धार्मिक महत्त्व आहे. आणि हेच खेटे पूर्ण झाल्यानंतर मुख्यत्वे यात्रेमध्ये हा भाविक जोतिबाच्या नावानं चांगभलंचा गजर करत सहभागी होतो. आणि या रविवारीही जोतिबाच्या डोंगरावर गुलाल-खोबऱ्याची उधळण केली जाते. दरम्यान आजपासून खेट्यांना सुरुवात झाली असली तरी चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर जोतिबा डोंगरावर ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडूनही आता यात्रेची तयारी सुरू करण्यात आली आहे.
