Rain Live Updates : राज्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये गेल्या 1-2 दिवसांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी तर पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, पालघर भागातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान खात्याने आजही असाच पाऊस राहील, असा इशारा दिला आहे. 20 जुलैला ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय पुणे आणि सातारा जिल्ह्यालाही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट म्हणजेच अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाच्या या इशाऱ्यामुळे आज मुंबई, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच स्थानिक प्रशासनाने तिथल्या परिस्थितीनुसार शाळांबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत.