विनया देशपांडे, मुंबई, 7 एप्रिल : कोरोना संदर्भात राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत राज्यातील लॉकडाऊन, कोरोनाचाबाधितांचा वाढता मृत्यूदर अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर खलबतं झाली आहेत. लॉकडाऊनसह इतर मुद्द्यांवर काय ठरलं? 1. लॉकडाऊनच्या कालावधीबाबत अद्याप अंतिम निर्णय नाही. येत्या काही दिवसांत राज्यातील परिस्थिती पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार निर्णय 2. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या मृत्यूदराबाबत काही मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. तसंच केरळमध्ये मृत्यूदर कमी असण्याची नेमकी काय कारणं आहेत, याबाबत मंत्रिमंडळातील काही सदस्यांनी चर्चा केली. 3. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकदिवशी जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या होण्याची गरज व्यक्त करण्यात आली. 4. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी शहरातील स्थितीबाबत मंत्रिमंडळ बैठकीआधी प्रेझेन्टेशन दिलं. 5. महाराष्ट्रात अडकलेल्या इतर राज्यातील मजुरांच्या प्रश्नांविषयीदेखील आजच्या बैठकीत चर्चा झाली. इतर राज्यांतील मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात सोडवण्यासाठी मदत करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे. परंतु देशभरातील लॉकडाऊन संपल्यानंतरचे हे शक्य होणार आहे. महाराष्ट्रातील काय आहे स्थिती? पुण्यात कोरोनाबाधित असलेल्या तिघा नागरिकांचा मंगळवारी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत मृत्यू झाला. तर राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत आज आणखी 10 रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 891 वर पोहोचला आहे. राज्यात आज सकाळपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा हा 23 ने वाढला आहे. मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 10 रुग्ण वाढले आहे. तर पुण्यात 4 रुग्ण आढळले आहे. तर सांगली 1, बुलडाणा 2, ठाणे 1 आणि नागपूर 2 आढळले आहे. संपादन- अक्षय शितोळे