मुंबई, 23 जुलै : राज्यभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या तीन महिन्याहून जास्त कालावधीपासून नागरिकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासाठी पुरेपुर प्रयत्न करीत आहेत. अशातच त्यांनी एक समस्त जनतेला एक विनंती केली आहे. ते म्हणाले की – यावर्षी मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही. त्यांनी सर्व समर्थक आणि शिवसैनिकांना विनंती केली आहे की त्यांनी वाढदिवसानिमित्त फ्लेक्स आणि होर्डिंग्स लावू नये. त्याऐवजी नागरिकांनी CM Relif Fund मध्ये दान करावं, रक्तदान शिबिरं भरवावी आणि कोरोनाग्रस्तांना प्लाझ्मा डोनेट करावा.
सध्या महाराष्ट्र कोरोनासारख्या महाभयंकर साथीशी सामना करीत आहे. गेल्या तीन महिन्यांच्या काळात अनेक सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीही केलं होतं. कोरोना बळावू नये यासाठी घरुन काम करा, गर्दी होईल असं वागू नका…असं आवाहन वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यातच ते यावर्षी कोरोनाच्या या कहराच्या काळात आपल्या वाढदिवस साजरा करणार नसल्याचे जनतेला सांगितलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीची जोरदार चर्चा सुरू आहे. सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. येत्या 25 आणि 26 जुलै रोजी दोन भागात ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे.