बीड, 22 जुलै : बीडच्या केज तालुक्यात दोघांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. औषधोपचारासाठी काढलेले कर्ज फेडायचे कसे, या चिंतेतून शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. तर याच गावातील एका तरुणाने बेरोजगारीला कंटाळून मृत्यूला कवटाळले. केज तालुक्यातील राजेगाव गावात 24 तासात दोन आत्महत्या झाल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी केज पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Beed Suicide)
सहा महिन्यांपूर्वी दुचाकीवरून पडून 40 वर्षीय सुग्रीव जाधव यांचा अपघात झाला. उपचारासाठी त्यांनी कर्ज काढले होते. त्यातच मागील २ वर्षे शेतात काही पिकले नव्हते. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत सुग्रीव जाधव यांनी पत्नी व मुले झोपल्यानंतर मध्यरात्री दरवाजाच्या कोड्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
हे ही वाचा : ‘एकच चूक झाली, पण ती आम्ही कधीच सुधारणार नाही’ नाशकात कोणत्या चुकीबद्दल बोलले आदित्य ठाकरे?
तर दुसऱ्या घटनेत अजित वसंत कोल्हे (33) याचे बीएस्सी बीएड शिक्षण झाले होते. तो खासगी नोकरीही करत होता . मात्र , कोरोना काळात त्याची नोकरी गेली होती . तेव्हापासून तो बेरोजगार होता . बेरोजगारी आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून अजितने रात्री घराच्या पत्र्याच्या लोखंडी आडूला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.
बीड जिल्ह्यात रोज एक आत्महत्या
बीड जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा चिंता वाढवत असल्याचे दिसून येत आहे. रोज एक शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे आकडेवारीवरून माहिती समोर आली आहे. मागच्या एका महिन्यात दिवसाला एक शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. जानेवारी 2022 ते जून 2022 या मागच्या सहा महिन्यात 181 दिवसांत 138 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा आत्महत्यांचा आकडा 54 ने अधिक आहे.
हे ही वाचा : Maharashtra Rain Update : विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता सतर्कतेचा इशारा, मुंबई, पुण्यात हलक्या सरी
बीड जिल्ह्यात कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात पीक कर्जमाफीतील त्रुटी, पीक कर्जवाटपातील दिरंगाई, हमी भाव, उत्पादित मालासाठी बाजारपेठ नसणे या कारणांनी जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. त्यातून कर्जबाजारीपणा व कर्ज फेडण्याच्या चिंतेतून शेतकरी आत्महत्यांच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. याचबरोबर कोरोनाकाळात नुकसानीत गेलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.