औरंगाबाद, 05 सप्टेंबर : मुलांनी शिकून मोठे व्हावे चांगली नोकरी मिळवावी यासाठी पालक आयुष्याची सारी शिदोरी पणाला लावतात. मुलांना महागड्या शाळेत टाकतात. यासाठी भरमसाठ फी देखील भरली जाते. मात्र, शाळेत म्हणून निघालेली 10 टक्के मुलं रोज शाळेत पोहचतच नाहीत. यामध्ये बहुतांश आठवी नंतरच्या वर्गातील विद्यार्थी असल्याची धक्कादायक माहिती औरंगाबाद जिल्ह्यातील प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या पाहणी दौऱ्यामध्ये समोर आली आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालया मार्फत औरंगाबाद जिल्ह्यातील शाळाना भेटी देण्यात आल्या या भेटी दरम्यान आढळून आले की विद्यार्थी शाळेचा गणवेश घालून आले होते. परंतु ते बराच वेळ बाहेरच खेळत बसलेले दिसले. त्यांच्याशी चर्चा केली असता ते शाळेत येण्यासाठी निघाले खरे परंतु शाळेत प्रत्यक्ष हजर नसल्याचे प्रादेशिक विद्या प्राधिकरण विभागाच्या पाहणीत दिसून आले. पूर्वी यामध्ये जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेच्या शाळांचा समावेश असायचा मात्र आता भरमसाठ फी घेणाऱ्या दर्जेदार शाळांचा देखील या मध्ये समावेश झाला आहे. हेही वाचा : गोदावरी नदी पात्रात असलेले ‘मोरेश्वर’ देवस्थान; पावसाळ्यात मंदिर असते पाण्याखाली, VIDEO हे आहे कारण मुलांना शाळेची गोडी नसल्यामुळे बाहेरच खेळतात. शाळेतला संवाद नसल्यामुळे शाळेत येत नाहीत. शिक्षणासाठी कुटुंबीयांचे दडपण, शाळेत शिकवलेले समजत नसल्याने बहुतांश मुलांमध्ये शाळेची गोडीच राहिलेली नाही. मुलांसाठी ट्रेकिंग यंत्रणा शाळाबाह्य मुलांच्या संदर्भात मुलांच्या ट्रेकिंग सिस्टम तयार करण्यात आल्या आहेत. एखादा मुलगा सलग तीन दिवस गैरहजर असेल तर तो शाळाबाह्य समजला जातो. अशा मुलांची माहिती घेऊन ते शाळेत का येत नाहीत काय अडचणी आहेत. शिक्षणाच्या पद्धतीत काय बदल हवा आहे का मुलाला समजत नाही किंवा त्याच्या घरच्या काही अडचणी आहेत हे समजून घेणार असल्याचं प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे डॉ. कलिमोद्दीन शेख यांनी सांगितले. लहान मुलांनाही भावना असतात त्या समजून घेतल्या पाहिजे. यामध्ये घरचे किंवा शिक्षक या दोघांची तेवढीच भूमिका आहे. शाळेतील मुलं एखाद्या मुलाची हेटाळणी करत असतील किंवा चिडवत असतील किंवा त्याला शाळेतील एखादा विषय समजण्यास अवघड जात असेल तर त्याला शाळेबद्दल गोडी राहत नाही. माझ्या भावना समजून घेणार कोणी नाहीये या मानसिकतेतून तो शाळेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो. यामुळे पालक आणि शिक्षकांनी मुलांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे व त्यांना अभ्यासाचे दडपण न टाकल्यास हे प्रमाण कमी होऊ शकते, असे मानसोपचार तज्ञ डॉ.संदीप शिसोदे यांनी सांगितले.