मुंबई, 22 नोव्हेंबर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे महाराष्ट्राबाहेर चालले आहेत. आदित्य ठाकरे हे उद्या बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. बिहार दौऱ्यात आदित्य आरजेडी नेते तेजस्वी यादव यांना भेटणार आहेत, त्यामुळे आदित्य ठाकरे अधिकाधिक युपीएमध्ये सक्रीय होत आहेत का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आरजेडीसोबत शिवसेनेचे सातत्याने खटके उडत आले, कारण शिवसेनेने पहिल्यांदा मराठीचा मुद्दा हाती घेतला होता, हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला होता. या विचारधारेच्या पूर्णपणे वेगळी विचारधारा आरजेडीची आहे, त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये मैत्री होतेय, का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तेजस्वी यादव हे बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत. तेजस्वी यादव यांनी स्वबळावर बिहारमध्ये आरजेडीचे सर्वाधिक आमदार निवडून आणले. बिहारच्या जनतेमध्ये तेजस्वी यादव यांनी त्यांचा करिश्मा दाखवून दिला, त्यासंदर्भातच ही भेट होत असल्याची माहिती समोर येत आहे. तेजस्वी यादव यांच्यासोबतच्या भेटीत आदित्य ठाकरे बिहारचं राजकारण समजून घेणार आहेत. तेजस्वी यादव या तरुण नेत्याने बिहारमध्ये कशाप्रकारे सर्वाधिक आमदार कसे निवडून आणले? त्यांचा निवडणुकीचा फॉर्म्युला काय? त्यांनी कशा तळागळात जाऊन प्रचार मोहिमा राबवल्या आहेत? विरोधातलं वातावरण असतानाही त्यांनी सर्वाधिक आमदार कशाप्रकारे निवडून आणले? हा फॉर्म्युला महाराष्ट्रासाठी वापरता येईल का? याची चाचपणी आदित्य ठाकरे करणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि त्याचसोबत दुसरे खासदार अनिल देसाईदेखील त्यांच्यासोबत असणार आहेत.