नवी दिल्ली, 12 जून: कोणताही माणूस आपल्या आयुष्यात चांगलं घडावं अशीच आशा करत असतो. काही जण चांगलं कर्म केल्यामुळे चांगलं आयुष्य मिळेल अशी धारणा मनात पक्की करतात तर काही जण आयुष्यात बदल घडवण्यासाठी ज्योतिषाचा आधार घेतात. चांगलं आयुष्य जगण्याचे काही नियम ज्योतिषशास्रात (Astrology) सांगितले आहेत. या शास्राचा सखोल अभ्यास केलेल्या एखाद्या व्यक्तीकडून सल्ला घेणं आणि आपल्या बुद्धीच्या कसावर तो पडताळून त्या सल्ल्यानुसार वागणं हे अनेकदा फायद्याचं ठरतं. पण थेट कुठल्यातरी पुस्तकात वाचून उपाय करणं नक्कीच त्रासदायक ठरू शकतं. त्यात फायदा होण्यापेक्षा तोटाच होण्याची शक्यता अधिक असते. असंच काहीसं अंगावर सोन्याचे दागिने, आभूषणं (Gold Jewellery) घालण्याबाबत असतं. महिलांना स्वाभाविकपणे सोन्याचे दागिने घालायला आवडतात तसंच पुरुषही हाताच्या बोटात अंगठ्या, गळ्यात सोनसाखळी घालतात. पण ज्यांचा ज्योतिष शास्रावर विश्वास आहे त्यांनी तरी सोन्याचे दागिने घालण्याआधी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तुमच्या कुंडलीतील (Kundali) गुरुच्या स्थानानुसार सोनं अंगावर घालणं लाभदायक (Benefit) किंवा तोट्याचं ठरू शकतं. कुंडलीतल्या गुरु ग्रहाच्या (Jupiter) स्थितीनुसार कोणी सोनं अंगावर घालावं हे जाणून घेऊया. झी न्यूजने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे. सोन्यामुळे माणसावर होणारा परिणाम ज्या जातकांची म्हणजे व्यक्तींची लग्न रास मेष (Aries), कर्क (Cancer), सिंह (Lion) आणि धनु (Sagittarius) आहे अशा व्यक्तींनी अंगावर सोनं घालणं ज्योतिषशास्रानुसार शुभ मानलं गेलं आहे. तसंच हातांच्या बोटात, पायांच्या बोटांत, नाकात, कानांत, गळ्यात, मनगटात, दंडात अशा विविध ठिकाणी सोन्याची आभूषणं घालण्याचे परिणाम वेगवेगळे असतात. जर तुम्ही गळ्यात सोन्याचा दागिना घातला तर त्याचा अर्थ असा की तुमच्या कुंडलीतला गुरु ग्रह तुमच्या लग्न भावात बसेल आणि त्या भावानुसार तुमच्या आयुष्यात तुम्हाला परिणाम जाणवतील. असंच हाता सोन्याचा दागिना अंगठी किंवा कडं घातलं तर गुरु ग्रह तुमच्या कुंडलीत तिसऱ्या भावात राहील. हा भाव ज्योतिषशास्रानुसार पराक्रमभाव आहे. म्हणजे ती व्यक्ती आयुष्यात पराक्रम गाजवू शकेल. सोनं अंगावर घातल्याने यांना होतो तोटा ज्योतिषशास्रानुसार जसं रत्न हे कुंडली बघूनच धारण केलं पाहिजे तसंच सोनंही कुंडलीतील गुरु ग्रहाची स्थिती पाहूनच अंगावर घातलं पाहिजे. तसं केलं नाही तर त्या सोनं घालण्यामुळे फायदा व्हायच्याऐवजी तोटाच अधिक होऊ शकतो.