Tu tevha tashi
मुंबई, 16 सप्टेंबर : झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. सौरभ अनामिकाची प्रेमळ लव्हस्टोरी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेत आता सौरभ आणि अनामिकाच्या नवीन नात्याची सुरुवात होणार आहे. पण हे नातं सुरु होताना या दोघांना काही संकटांचा सामना करावा लागणार हे निश्चित. आता मालिकेत अनामिका आणि सौरभच्या नात्यात अनामिकाचा पहिला नवरा आकाश जोशी एंट्री झाली आहे. त्यामुळे आता मालिकेत जबरदस्त ट्विस्ट येत आहेत. सौरभला अनामिकाने लग्नाला नकार दिला होता. त्याचं कारण आता सौरभसमोर येणार आहे. आकाश आणि सौरभ समोरासमोर येणार आहेत. ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत अनामिकाचा भूतकाळ पुन्हा परतला आहे. आकाश अनामिकाच्या घरी आला आहे. त्याने सध्या अनामिकाला धमकी द्यायला सुरुवात केली आहे. मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यानुसार आकाश सौरभ आणि अनामिकाच्या ऑफिसमध्ये त्यांचा नवीन बॉस म्हणून आला आहे. त्याला एवढ्या वर्षांनंतर पाहून सौरभला चांगलाच धक्का बसलाय. आकाश सौरभला म्हणतो, ‘२२ वर्षानंतर तुला पाहून मला खूप आनंद झालाय.’ मात्र सौरभ अजूनही धक्क्यातच असतो.
आकाशने अनामिकाला सौरभसोबत असलेलं नातं तोडायला सांगितलं होतं. त्याच ऐकून अनामिकाने सौरभला लग्नासाठी नकार दिला होता. पण सौरभला त्यामागचं कारण समजलं नव्हतं. आता मात्र सौरभ आणि आकाश समोरासमोर येणार आहेत. त्यामुळे सौरभला अनामिकाने नकार का दिला याचं सत्य उलगडणार आहे. आता अनामिकाची मजबुरी सौरभला समजेल का ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. हेही वाचा - Taarak Mehta Ka Ooltah Chashma : ठरलं! दयाबेन मालिकेत परतणार; निर्मात्यांनी स्वतः केलं उघड आता सौरभ आणि अनामिकाच्या नात्यावर आकाशाचा एंट्रीचा काय परिणाम होईल. तसेच राधाने आता कुठे सौरभला स्वीकारलं आहे त्यामुळे आकाशच्या येण्यामुळे तिच्यावर काय परिणाम होईल ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. आकाशची भूमिका प्रसिद्ध अभिनेते अशोक समर्थ हे साकारणार आहेत.
आधीच स्वप्नील जोशी, शिल्पा तुळसकर अशी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या मालिकेत आता अशोक समर्थ यांची एंट्री झाली आहे. मात्र मालिकेतील हा ट्विस्ट प्रेक्षकांना फारसा आवडलेला दिसत नाहीये. त्यांनी या पोस्टवर कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे. प्रेक्षकांनी ‘तू तेव्हा तशी’ मालिकेची तुलना ‘माझी तुजी रेशीमगाठ’ मालिकेशी केली आहे. प्रेक्षकांनी या पोस्टवर ‘काही तरी वेगळं दाखवा,’ ‘प्रत्येक मालिकेत तेचतेच नको’ अशा कमेंट केल्या आहेत.