मुंबई, 26 ऑगस्ट- तब्बल 15 दिवसानंतरनंतर राजू श्रीवास्तव शुद्धीवर आल्याने त्यांचे चाहते आणि जवळचे लोक फार आनंदी आहेत. डॉक्टरांच्या योग्य उपचारांमुळे आणि लोकांच्या प्रार्थनांमुळे हा विनोदवीर कोमातून बाहेर आला आहे. शुद्धीवर आल्यांनतर त्यांनी पहिल्यांदा पत्नीशी संवाद साधला. राजू श्रीवास्तव यांचे जवळचे मित्र अशोक मिश्रा यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. आज तकच्या रिपोर्टनुसार, अशोक मिश्रा यांनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत सांगितलं की, ‘सर्व कॉमेडियन मित्र काल रात्री अंधेरीत एकत्र होते. आम्ही सर्वजण राजूच्या तब्येतीची काळजी करत होतो. राजूभाऊ लवकर बरे व्हावेत म्हणून परवा रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही सर्वजण प्रार्थना करत होतो.अशोक मिश्रा पुढे म्हणाले की, जेव्हा मी झोपेत होतो, तेव्हा माझा फोन वाजला. त्या आवाजाने मला जाग आली. राजूभाऊ यांचे मेहुणे आशिष श्रीवास्तव यांनी तो फोन केला होता. तो खणखणीत आवाजात मला म्हणाला. अशोक आता उठा…किती झोपणार? मला ते सगळं खटकलं. माझ्या मनात विचार आला विचार आला. एकीकडे राजूभाऊ आजारी आहेत आणि हे असे बोलत आहेत. त्यांनी पुढे म्हटलं की, तू झोपला आहेस, तुझा भाऊ तिथे उठला आहे. आपला मित्र राजू शुद्धीवर आल्याची बातमी ऐकून अशोक मिश्रा यांच्या अंगात आनंद आणि आश्चर्य एकाच वेळी संचारला होता. त्यांनी म्हटलं, ‘राजूभाऊला 15 दिवसांनी शुद्ध आली आहे. राजूभाऊंनी डोळे उघडल्यानंतर तो कोण आणि कुठे आहे हे त्याला समजतं की नाही हे जाणून घेण्यासाठी त्यांची पत्नी धडपडत होती. राजूभाऊंनी हातवारे करुन समजावलं. **(हे वाचा:** Raju Srivastav Health Update:तब्बल 15 दिवसानंतर राजू श्रीवास्तव शुद्धीवर; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती ) अशोक मिश्रा यांनी सांगितलं की, राजूभाऊ यांनी गेल्या 15 दिवसांपासून काहीही खाल्लेलं नाहीय. ते कोमात होते. त्यामुळे त्यांना प्रचंड अशक्तपणा आला आहे. त्यांना काहीच बोलता येत नाही. राजूभाऊ यांनी अडखळत आणि थरथरत्या आवाजात आपल्या पत्नीला म्हटलं - ‘हो, मी ठीक आहे.’ त्यांचे ओठ हलताना दिसत होते. राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीने तातडीने तेथे उपस्थित डॉक्टरांना माहिती दिली. राजू श्रीवास्तव यांचे सल्लागार अजित सक्सेना यांनी सांगितलं की, कॉमेडियन सकाळी 8.10 वाजता शुद्धीवर आले आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीत सकारात्मक सुधारणा होताना दिसून येत आहे.