वैशाली टक्कर, उर्वशी रौतेला
मुंबई, 18ऑक्टोबर : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री वैशाली टक्करच्या आत्महत्येच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. वैशालीने अचानक हे टोकाचं पाऊल का उचललं असावं?, असा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडला आहे. इंदूर येथील राहत्या घरी वैशालीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत असलेल्या पहायला मिळत आहे. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलानंही तिच्याविषयी पोस्ट केली आहे. उर्वशीने इन्स्टा स्टोरीवर लिहिलं की, ‘वैशालीच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करते. प्रेम आणि रोमान्स हे चित्रपट आणि टीव्ही शोच्या प्राथमिक गोष्टी आहेत. तुमचे खरे प्रेम शोधण्यापेक्षा हृदयाला आनंद देणारे दुसरे काहीही नाही. मग असे का झाले? वैशाली तुझ्या आत्म्याला शांती लाभो…’. उर्शवशीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पोलिसांनी अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांना वैशालीच्या मृतदेहा शेजारी सुसाईड नोटसुद्धा हाती लागली आहे. वैशाली टक्कर आत्महत्येप्रकरणी तेजाजी नगर पोलीस ठाणे तपास करत आहेत. पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असल्याने लवकरच या घटनेचा उलघडा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वैशालीच्या मृत्यूच्या एक दिवस आधीपर्यंत ती ठीक होती आणि लवकरच विवाहबंधनात अडकणार होती. अभिनेता विकास सेठी आणि त्याची पत्नी जान्हवी राणा वैशालीच्या खूप जवळ होते. तिने आत्महत्या करण्याच्या एक दिवस आधी वैशालीशी फोनवर तिचं बोलणं झालं होतं. वैशाली लग्नाच्या खरेदीसाठी मुंबईला येणार असा प्लॅन केला होता. ही अभिनेत्री डिसेंबरमध्ये कॅलिफोर्नियास्थित एका सॉफ्टवेअर इंजिनिअरशी लग्न करणार होती.