काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या पोस्टरबाजीची मुंबईत पुनरावृत्ती पाहायला मिळते आहे. ‘आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली?’ असा सवाल या पोस्टर्समधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींविरोधात दिल्लीनंतर आता मुंबईतही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मुंबईतील घाटकोपर याठिकाणी कोरोना लशीसंदर्भात टीका करणारी पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
या पोस्टरमध्ये असा सवाल करण्यात आला आहे की, 'मोदीजी हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया?'. आमच्या मुलांसाठी असणारी लस परदेशात का पाठवली असा सवाल या पोस्टरमधून विचारण्यात आला आहे. काँग्रेसकडून हा प्रश्न करण्यात आला आहे.
घाटकोपरमध्ये विविध भागात ही पोस्टर्स लावण्यात आली असून त्यावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नावं आहे. यामध्ये आमदार भाई जगताप, मा.आमदार चरणसिंग सप्रा, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष अब्राहम रॉय मणी आणि ब्रिजेश रवि भाटला या पदाधिकाऱ्यांची नाव आहेत.
मोदी सरकारवर टीका करणाऱ्या या पोस्टर्सची सध्या चांगलीच चर्चा मुंबईत रंगली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली होती. पण दिल्लीत पोस्टर लावणं अनेकांना महागात देखील पडलं होतं. आता मुंबईत लावलेल्या पोस्टर्सनंतर काय पडसाद उमटतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल
देशभरात कोरोनाच्या लसीकरणासाठी लसींचा तुटवडा जाणवत आहे. अनेक नागरिकांना पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घ्यायलाही प्रचंड उशीर होत असल्याचं त्यामुळं समोर येतंय. महाराष्ट्रात तर 18-44 वयोगटातील लसीकरणाला ब्रेकच लागला आहे. या सर्व मु्द्द्यांवरून केंद् सरकारवर विविध आरोप होत आहेत. देशातील नागरिकांना लस नसताना विदेशामध्ये लसींचे डोस का पाठवले असा सवाल मोदींना विचारला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील घाटकोपर याठिकाणी अशाप्रकारे पोस्टरबाजी करण्यात आली आहे
कोरोना लसीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि काँग्रेस पुन्हा एकदा आमने-सामने येत असल्याचं या पोस्टर्सवरून आणि काँग्रेसनं घेतलेल्या पवित्र्यावरून दिसून येत आहे. कारण सुरुवातीला दिल्लीत लावण्यात आलेल्या पोस्टर्सना काँग्रेसने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहिमेचं स्वरुप दिलं होतं.
दिल्लीत लावण्यात आलेल्या पोस्टर्सनंतर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी तब्बल 21 गुन्हे दाखल केले. 12 जणांना अटक करण्यात आली तसेच शेकडो पोस्टरही जप्त केले. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आणि इतर कलमांखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
काँग्रेसने दिल्लीत सुरू झालेल्या या पोस्टरबाजीनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका केली. प्रियांका गांधींसह काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी #newprofilepic वापरून मोदींवर लसीच्या मुद्द्यावरून टीका केली होती.
'मला देखील अटक करा..' असं ट्वीट करत राहुल गांधी यांनी देखील मोदी सरकारला हाच सवाल केला होता.