राज्यात सर्वत्र उन्हाची आणि पाणीटंचाईची धग बसू लागली आहे. ग्रामीण भागांत घागरभर पाण्यासाठी जनतेचा टाहो सुरू आहे. जलस्राोत पूर्णपणे आटल्यामुळे आणि छोट्या धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने 23 जिल्ह्यांतील तब्बल 10 हजार गाव-पाड्यांना 3500 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. दुसरीकडे चाराटंचाईची स्थिती असून त्यामुळे पशुधन संकटात आहे. राज्यभरातील धरणांमध्ये जेमतेम २४.२४ टक्के जलसाठा शिल्लक असून मराठवाड्यामधील धरणांमध्ये फक्त ९.८७ टक्के तर पश्चिम महाराष्टात १८.५४ टक्के जलसाठा आहे. उन्हाच्या झळा आणि स्थानिक जलस्राोत कमी पडू लागल्याने ग्रामीण भागांत टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.