नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : देशातील प्रसिद्ध फूड अँड पॅकेजिंग कंपनी हल्दीरामवर (Haldiram) सायबर हल्ल्याची (Cyber Attack) झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी कंपनीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. सायबर हल्लेखोरांनी कंपनीच्या अनेक विभागातील डेटा डिलीट केला आहे, त्यामुळे कंपनीला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. डेटा परत करण्यासाठी सायबर हल्लेखोरांनी 7 लाख रुपयांची मागणी केली आहे. माध्यम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फूड अँड पॅकेजिंग कंपनी हल्दीरामचं नोएडामध्ये कॉर्पोरेट ऑफिस आहे. कंपनीचा आयटी विभाग येथूनच कार्यरत असतो. 12 आणि 13 जुलै रोजी रात्री कॉर्पोरेट ऑफिसच्या सर्व्हरवर व्हायरस अटॅक करण्यात आला होता. या व्हायरस अटॅकमुळे कंपनीच्या मार्केटिंग बिझनेसपासून ते इतर अनेक विभागांचा डेटा गायब झाला आहे. तसंच अनेक विभागांचा डेटा डिलिटही करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, कंपनीच्या अनेक फाईल्सही गायब झाल्या आहेत. उच्च अधिकाऱ्यांना फाईल्स गायब झाल्याची माहिती मिळताच, अंतर्गत चौकशी करण्यात आली. त्यादरम्यान सायबर हल्लेखोरांनी चॅटद्वारे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे 7 लाखांची मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, कोविडच्या काळात, जुलै महिन्यात जगभरातील अनेक कंपन्यांवर व्हायरस अटॅक झाला होता. त्यादरम्यान हल्दीराम कंपनीवरही हा हल्ला झाला. आता या प्रकरणी कंपनीचे आयटी प्रमुख अजीज खान यांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.