टीम इंडियाचा क्रिकेटपटू मनोज तिवारी (Manoj Tiwari) आता राजकारणाच्या आखड्यात उतरला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Elections 2021) ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) तृणमूल काँग्रेसने (TMC) मनोज तिवारला तिकीट दिलं आहे.
टीम इंडियाचा क्रिकेटपटू मनोज तिवारी आता राजकारणाच्या आखड्यात उतरला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने मनोज तिवारला तिकीट दिलं आहे. हावडा जिल्ह्याच्या शिबपूर विधानसभा मतदारसंघातून मनोज तिवारी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मागच्याच महिन्यात मनोज तिवारीने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. निवडणुकीच्या रिंगणात उतरणारा मनोज तिवारी काही पहिला क्रिकेटपटू नाही.
टीम इंडियाचा माजी ओपनर गौतम गंभीर याने 22 मार्च 2019 ला भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर लगेच दिल्लीतून तो लोकसभा निवडणुकीसाठी उभा राहिला. या निवडणुकीत विजय मिळवत गंभीर लोकसभेत दाखल झाला.
2009 साली मोहम्मद अझहरुद्दीनने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर उत्तर प्रदेशच्या मोरादाबादमधून 2009 सालीच अझर लोकसभेची निवडणूक लढला आणि खासदार झाला. 1990 च्या दशकात अझरने 47 टेस्टमध्ये भारताचं नेतृत्व केलं.
नवजोत सिंग सिद्धू यांनी 2004 साली भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढली. 2014 साली भाजपने सिद्धूला तिकीट नाकारलं आणि त्या जागेवर अरुण जेटलींना उभं केलं. 2016 साली सिद्धूला भाजपने राज्यसभेवर पाठवलं, पण त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
भारताचे माजी ऑल राऊंडर किर्ती आझाद 1983 वर्ल्ड कप विजयी भारतीय टीमचे सदस्य होते. बिहारच्या दरभंगा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर ते तीनवेळा निवडून आले. पण फेब्रुवारी 2019 साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. किर्ती आझाद हे बिहारचे माजी मुख्यमंत्री भागवत झा आझाद यांचे पूत्र आहेत. याआधी किर्ती आझाद दिल्लीच्या गोल मार्केट मतदारसंघाचे आमदारही होते.
सुनिल गावसकर यांच्यासोबत ओपनिंगला खेळणारे चेतन चौहान उत्तर प्रदेशच्या अमरोहा मतदारसंघातून दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले. 1981 साली क्रिकेट कारकीर्द संपवल्यानंतर चेतन चौहान यांनी राजकारणात प्रवेश करत भाजपचं कमळ हातात घेतलं. काहीच महिन्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू होण्यापूर्वी चेतन चौहान उत्तर प्रदेश सरकारमध्ये क्रीडा मंत्री होते.
भारतासाठी 125 वनडे आणि 13 टेस्ट खेळणाऱ्या मोहम्मद कैफने 2014 साली काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढली. उत्तर प्रदेशच्या फूलपूरमधून कैफ रिंगणात उतरला होता, पण या निवडणुकीत त्याला पराभव पत्करावा लागला.
टीम इंडियाचे माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी हेदेखील काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढले होते. कपिल देव आणि राजीव गांधी यांनीही पतौडींसाठी प्रचार केला होता, पण याचा काहीच फायदा झाला नाही. निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांनी राजकारणापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला.