सिडनी, 10 जानेवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सिडनीमध्ये तिसरी टेस्ट सुरु आहे. या टेस्टच्या दरम्यान जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज (Jasprit Bumrah Racially abused) यांच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली आहे. टीम इंडियानं (Team India) या प्रकरणात मॅच रेफ्रीकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची ICC नं गंभीर दखल घेतली आहे. पण याप्रकरणी आता भारताचा कर्णधार विराट कोहलीने देखील संताप व्यक्त केला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली त्याच्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो. गेल्या दोन दिवसांपासून भारतीय खेळाडूंवर होणाऱ्या वर्णद्वेषी टिप्पणीवर आता विराट भडकला आहे. विराट सध्या पॅटेर्नीटी लिव्हवर आपल्या मायदेशी आहे. त्याच्या अनुपस्थितीत हा प्रकार घडला आहे. त्यामुळे आपल्या खेळांडूना पाठिंबा देण्यासाठी त्यानं ट्वीट करत यासंबंधित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
त्यानं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘वर्णद्वेषी टिप्पणी करणं हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. बॉन्ड्री लाइन्सवर भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टिप्पणी करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. संबंधित प्रेक्षकांनी अभद्र वागणुकीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अशी आक्षेपार्ह घटना मैदानावर घडली, हे ऐकून वाटलं.’ विराट पुढे असाही म्हणाला की, ‘या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून संबंधित दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी,’ अशी मागणीही विराट कोहलीने केली आहे.
काय आहे प्रकरण? या विषयावर समोर आलेल्या माहितीनुसार, सिडनी टेस्टच्या तिसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांना उद्देशून वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली आहे. सिडनी टेस्ट पाहण्यासाठी आलेल्या काही प्रेक्षकांनी त्यांना उद्देशून हे शब्द वापरले. सिराज आणि बुमराह यांना गेल्या दोन दिवसांपासून प्रेक्षक टार्गेट करत आहेत, अशी माहिती आहे. विशेष म्हणजे सिडनीमध्ये सध्या केवळ 10 हजार प्रेक्षकांनाच मॅच पाहण्यासाठी परवानगी आहे.