मुंबई, 25 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानकडून (India vs Pakistan) दारूण पराभव झाला. भारताने दिलेलं 152 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) 55 बॉलमध्ये नाबाद 79 रन आणि कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) 51 बॉलमध्ये नाबाद 66 रन केले. पाकिस्तानने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर शाहिन आफ्रिदीने (Shaheen Afridi) सुरुवातीलाच भारताला दोन धक्के दिले. रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्याच बॉलला आऊट झाला, यानंतर आफ्रिदीने केएल राहुलला (KL Rahul) बोल्ड केलं. राहुलची विकेट गेल्यानंतर सूर्यकुमार यादवही (Suryakumar Yadav) स्वस्तात आऊट झाला. यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) मदतीने भारताच्या इनिंगला आकार दिला. ऋषभ पंतने 30 बॉलमध्ये 39 रन केले, तर विराट कोहली 49 बॉलमध्ये 57 रन करून आऊट झाला. भारताचा पराभव झाल्यानंतर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) खळबळजनक दावा केला आहे. पाकिस्तानच्या विजयानंतर भारतातल्या काही ठिकाणी फटाके फोडण्यात आले, असा आरोप सेहवागने केला आहे. ‘दिवाळीमध्ये फटाके वाजवण्यावर बंदी आहे, पण तरीही काल पाकिस्तानच्या विजयानंतर भारताच्या काही भागांमध्ये फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. ते क्रिकेटच्या विजयां सेलिब्रेशन करत होते. मग दिवाळीमध्ये फटाके फोडले तर काय होतं? हा दांभिकपणा का? सगळं ज्ञान तेव्हाच का आठवतं?’ असा सवाल सेहवागने उपस्थित केला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर आता भारताचा पुढचा सामना न्यूझीलंडविरुद्ध रविवार 31 ऑक्टोबरला होणार आहे. भारताच्या ग्रुपमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडसह अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंड आहे. या ग्रुपमधल्या टॉप-2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. India vs Pakistan: संतापजनक! टीम इंडियाच्या पराभवानंतर शमीवर झाले फिक्सिंगचे आरोप