दिल्ली, 18 जून : भारताचे बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी इंडोनेशिया ओपनचं विजेतेपद पटकावून इतिहास घडवला आहे. पुरुष दुहेरीत सात्विक आणि चिरागने अंतिम सामन्यात मलेशियाच्या आरोन चिया आणि सोह वुई यिकला हरवलं. मलेशियाच्या जोडीचा 21-17, 21-18 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. सात्विक आणि चिराग या जोडीचं हे पहिलं सुपर 1000 वर्ल्ड टूर विजेतेपद आहे. मलेशियाच्या जोडीविरुद्ध ७ वेळा पराभव झाल्यानंतर सात्विक चिराग यांना पहिल्यांदा विजय मिळवता आला. इंडोनेशिया ओपनच्या डबल्स इव्हेंटमध्ये भारताचं हे पहिलं विजेतेपद आहे. आरोन चिया आणि सोह वुई यिक यांची जोडी पुरुष डबल्समध्ये वर्ल्ड चॅम्पियन आहे. भारताच्या सात्विक आणि चिराग यांनी पहिला गेम जिंकला होता. मलेशियाच्या जोडीने सामन्यात सुरुवात आक्रमक केली होती. त्यांच्याकडे आघाडी होती पण पुन्हा मुंसडी मारत भारताच्या जोडीने पुनरागमन केलं. त्यानंतरही लढत अतितटीची झाली. १८ मिनिटात भारतीय जोडीने पहिला सेट जिंकला.