पोटचेफ़्स्टरूम, 09 फेब्रुवारी : आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कपमधील अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशसमोर 177 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यात सलामीवीर यशस्वी जयस्वाल वगळता भारताच्या इतर कोणत्याही फलंदाजाला कमाल करता आली नाही. त्यामुळे भारताचा डाव 47.2 ओव्हर्समध्ये सर्वबाद 177 धावांवर आटोपला. सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत 88 धावा फटकावल्या. मात्र त्याला दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. परिणामी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बांगलादेशसमोर धावांचं मोठं आव्हान ठेवण्यात भारतीय संघाला अपयश आलं. धावा काढताना झालेल्या संवादाच्या अभावामुळे भारताचे काही फलंदाज धावबाद झाले. त्यामुळे खराब फटकेबाजीसह हेदेखील फलंदाजांच्या सुमार कामिगरीला महत्त्वपूर्ण कारण ठरले. दरम्यान, सेमीफायनलमध्ये भारतीय चाहत्यांनी पाकच्या संघाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं. त्याचं कारण होतं धाव काढताना पाकचे दोन्ही फलंदाच एकाच दिशेने धावत सुटले होते. मात्र असं असताना आजच्या सामन्यात भारतीय संघाबाबतही असाच काहीसा प्रकार घडला. भारताचे फलंदाज धाव घेताना एकाच दिशेने धावत सुटले आणि धावबाद झाले. त्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनीही सोशल मीडियावर टीमच्या ट्रोलींगचे उट्टे काढले आहे.