गौतम गंभीरची टी-20 वर्ल्ड कपबाबत भविष्यवाणी
मुंबई, 20 ऑगस्ट : टी-20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup) आयोजन यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएईमध्ये (UAE) होणार आहे. तब्बल 5 वर्षांनी टी-20 वर्ल्ड कप होणार असल्यामुळे चाहत्यांमध्येही या स्पर्धेविषयीची उत्सुकता वाढली आहे. भारताला 2007 टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या गौतम गंभीरने (Gautam Gambhir) सेमी फायनलच्या 4 टीमबाबत भविष्यवाणी केली आहे. कोणत्या 4 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील, हे गौतम गंभीरने सांगितलं आहे. भारत (India), न्यूझीलंड (New Zealand), इंग्लंड (England) आणि वेस्ट इंडिज (West Indies) या टीम सेमी फायनलमध्ये दिसू शकतात, असं गंभीर म्हणाला आहे. स्टार स्पोर्ट्ससोबत गौतम गंभीर बोलत होता. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात खेळणारी भारतीय टीम कागदावर मजबूत वाटत आहे, तर वेस्ट इंडिजच्या टीमने मागचा टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. वेस्ट इंडिजने 2016 साली फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव केला होता. भारताने 2007 सालच्या पहिल्या टी-20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं होतं. न्यूझीलंडला अजून एकदाही टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. गौतम गंभीर भारताकडून 58 टेस्ट, 147 वनडे आणि 37 टी-20 खेळला. टेस्टमध्ये त्याने 4,154 रन, वनडेमध्ये 5,238 रन आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 932 रन केले. गौतम गंभीर भारताकडून आपली अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच 2016 साली इंग्लंडविरुद्ध खेळला होता.