भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील 5 टी20 सामन्यांची मालिका 9 जूनपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी आयपीएल 2022 मध्ये चांगली कामगिरी केलेल्या 7 खेळाडूंकडं निवड समितीनं दुर्लक्ष केलं आहे
मुंबई, 23 मे: भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील 5 टी20 सामन्यांची मालिका 9 जूनपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड केली आहे. आयपीएल 2022 मध्ये चांगली कामगिरी केलेल्या 7 खेळाडूंकडं निवड समितीनं दुर्लक्ष केलं आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतरही अनुभवी शिखर धवनचा (Shikhar Dhawan) टीम इंडियात समावेश करण्यात आलेला नाही. शिखरनं पंजाब किंग्जकडून खेळताना सर्वात जास्त 418 रन केले. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश असून त्याचा स्ट्राईक रेट 120 होता.
दिल्ली कॅपिटल्सचा ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) 10 सामन्यात 28 च्या सरासरीनं 283 रन केले. गेल्या 3 आयपीएल सिझनपासून त्याचा स्ट्राईक रेट 150 पेक्षा जास्त आहे. अन्य कोणताही भारतीय बॅटर त्याच्या जवळपास नाही. त्यानंतरही पृथ्वीकडं निवड समितीनं दुर्लक्ष केलं आहे.
संजू सॅमसनच्या (Sanju Samson) कॅप्टनसीमध्ये राजस्थान रॉयल्सनं दमदार कामगिरी केली असून पॉईंट टेबलमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. संजूनं 14 सामन्यात 29 च्या सरासरीनं 374 रन केले असून त्याचा स्ट्राईक रेट 147 आहे.
राहुल त्रिपाठीनं सनरायझर्स हैदराबादकडून 14 सामन्यात 38 च्या सरासरीनं 413 रन केले आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 158 होता. या दमदार कामगिरीनंतरही त्रिपाठीला टीम इंडियात संधी मिळालेली नाही.
अनुभवी फास्ट बॉलर मोहम्मद शमीनं गुजरात टायटन्सकडून खेळताना कमाल केली आहे. त्यानं जवळपास प्रत्येक मॅचमध्ये नव्या बॉलनं विकेट घेतली आहे. 14 सामन्यात 18 विकेट्स घेणाऱ्या शमीचा टीम इंडियात समावेश करण्यात आलेला नाही.
सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या टी. नटराजननं 14 सामन्यात 11 मॅचमध्येच 18 विकेट्स घेतल्या आहेत.'डेथ ओव्हर्स' स्पेशालिस्ट नटराजनच्या कामगिरीकडं निवड समितीनं दुर्लक्ष केलंय.
दुखापतीनंतर कमबॅक करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरनं 7 सामन्यांमध्ये 101 रन केले असून त्याचा स्ट्राईक रेट 146 होता. त्याचबरोबर त्यानं 6 विकेट्सही घेतल्या. निवड समितीनं सुंदरच्या ऐवजी आयपीएल 2022 मध्ये फेल गेलेल्या व्यंकटेश अय्यरलाच पुन्हा एकदा संधी दिली आहे.
दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया : केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक