मुंबई, 30 सप्टेंबर : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Delhi Capitals vs Kolkata Knight Riders) यांच्यातील मॅचला आता दोन दिवस उलटले आहेत. या मॅचमध्ये कोलकातानं (KKR) दिल्लीचा (DC) 3 विकेट्सनं पराभव केला. ही मॅच संपली असली तरी मॅचच्या दरम्यान झालेला वाद अजूनही सुरूच आहे. या मॅचमध्ये केकेआरचा (KKR) कॅप्टन इयन मॉर्गन (Eoin Morgan) आणि दिल्लीचा (DC) अनुभवी बॉलर आर. अश्विन (R. Ashwin) यांच्यात भर मैदानात वाद झाला होता. या वादाचे क्रिकेट विश्वात जोरदार पडसाद उमटले. शेन वॉर्नसह (Shane Warne) काही क्रिकेटपटूंनी या विषयावर अश्विनला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला होता. तर भारतीय क्रिकेटपटूंनी अश्विनची बाजू घेतली होती. आता या सर्व वादावर अश्विननं उत्तर दिलं आहे. अश्विननं काही ट्विट्स करत या विषयावरील त्याची बाजू मांडली आहे. ‘मी फिल्डरनं थ्रो केला त्याचवेळी रन काढण्यासाठी पळालो होतो. तो बॉल ऋषभ पंतला लागला हे मी पाहिलं नव्हतं. मी ते पाहिलं असंत तरी रन काढण्यासाठी धावलो असतो, कारण ही गोष्ट क्रिकेटच्या नियमांमध्ये आहे. मॉर्गनला वाटतं तसं मी खेळाला काळिमा फासला आहे का? तर अजिबात नाही.’ असं अश्विननं स्पष्ट केलंय.
त्यानंतर अश्विन पुढे म्हणतो की, ‘मी मारामारी केली का? तर नाही. मी माझ्या तत्वासाठी तिथं उभं राहिलो. मला माझ्या पालकांनी आणि शिक्षकांनी हेच शिकवलं आहे. तुमच्या मुलांना देखील त्यांच्या स्वत:साठी ठाम राहायला शिकवा. साऊदी आणि मॉर्गनच्या क्रिकेट विश्वात त्यांना जे वाटतं ते योग्य किंवा अयोग्य हे समजण्याचा अधिकार आहे. पण, त्यांना कुणावरही अपमानजनक टिप्पणी करण्याचा अधिकार नाही.
या विषयाची चर्चा करणारे तसंच नेमकं काय झालं ही वस्तुस्थिती मांडणारी मंडळी देखील चांगली किंवा वाईट ठरत आहेत, हे आश्चर्यकारक आहे. जगात अनेक क्रिकेटपटू आहेत. ते त्यांच्या विचारानुसार खेळ खेळतात. एक खराब थ्रो मुळे तुम्ही काढलेला एक रन तुमचे करिअर बनवू शकतो. तसेच नॉन स्ट्रायकरनं केलेली एका यार्डची चूक तुमचं करिअर बरबाद करु शकते, हे त्यांना शिकवा. एक रन काढण्यास नकार दिला आणि नॉन स्ट्रायकर एंडला उभं राहिला म्हणजे तुम्ही चांगले क्रिकेटपटू ठरता, असं सांगून त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करु नका. क्रिकेट खेळताना मैदानात तुमचं सर्वस्व पणाला लावा. नियमांच्या आधारे खेळा आणि मॅच संपल्यानंतर प्रतिस्पर्ध्यांशी हस्तांदोलन करा. हे मला समजलेले ‘Spirit of Game’ आहे.’ असं उत्तर अश्विननं दिलं आहे.
काय घडला होता प्रकार? दिल्ली विरुद्ध कोलकाता मॅचमध्ये अश्विन आणि मॉर्गन यांच्यात वाद झाला होता. मॅच संपल्यानंतर हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या दिनेश कार्तिकनं मैदानात काय घडलं ते सांगितलं होतं. दिल्लीची बॅटिंग सुरू असताना राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) फेकलेला थ्रो बॅटिंग करत असलेल्या ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) शरिराला लागला आणि दुसरीकडे गेला. अश्विनने या संधीचा फायदा घेत रन काढण्याचा प्रयत्न केला.
माझ्या मते मॉर्गनला हे आवडलं नाही. बॉल चुकून बॅट्समनच्या बॅटला लागला असेल तर खेळ भावनेचा आदर करुन त्यावर रन काढू नये, अशी मॉर्गनची अपेक्षा होती.’ असं स्पष्टीकरण कार्तिकनं दिलं होतं.