IPL सुरु असताना बीसीसीआयने डोमेस्टिक क्रिकेट स्पर्धांच्या बक्षिस रकमेत केली मोठी वाढ
मुंबई, 16 एप्रिल : बीसीसीआय भारतीय क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी मागील काळात अनेक महत्वाचे निर्णय घेत आहे. महिला प्रीमियर लीग सुरु करण्यासह यंदाच्या आयपीएल सारख्या जगप्रसिद्ध लीगमध्ये देखील मोठे बदल करत असताना आता डोमेस्टिक म्हणजेच देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांना प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. रविवारी जय शहा यांनी याबाबत ट्विट करत मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या बक्षिस रकमेत वाढ करत असल्याचे सांगितले. देशांतर्गत क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयने हा निर्णय घेतला असून याअंतर्गत रणजी ट्रॉफी , इराणी ट्रॉफी , दुलीप ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, देवधर ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, वरिष्ठ महिला वन डे ट्रॉफी, वरिष्ठ महिला ट्वेंटी-20 ट्रॉफी इत्यादी स्पर्धांचा समावेश असणार आहे.
बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या विजेत्यांच्या रकमेत जवळपास दुपटीने वाढ केली आहे. यापूर्वी देशातील बहूप्रतिष्टीत रणजी ट्रॉफी च्या विजेत्याला 2 कोटी, उपविजेत्याला 1 कोटी आणि सेमीफायनल मधील संघांना 50 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळत होते. परंतु आता रणजी ट्रॉफी च्या विजेत्याला 5 कोटी, उपविजेत्याला 3 कोटी आणि सेमीफायनलमधील संघांना 1 कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच इराणी ट्रॉफीतील विजेत्यांना आता 50 लाख तर उपविजेत्यांना 25 लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. अशाच प्रकारे इतर स्पर्धांच्या बक्षीस रकमेत बीसीसीआयकडून भरगोस वाढ करण्यात आली आहे.