15 सप्टेंबर : स्मार्ट सिटी होऊ घातलेल्या नागपुरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली असतांना महापालिकेच्या वतीने भर पावसात डांबर पावसाच्या पाण्यात टाकून पैशाचा चुराडा केला जात असल्याचं पुढ आलंय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद २२ सप्टेबरला शहरात एक येत असल्यामुळे अनेक रस्त्यांची दुरुस्ती सुरू आहे. त्यातच राष्ट्रपती जाणार असलेल्या अजनी रेल्वे मेन्स शाळेजवळील रस्त्याचा काही भाग चक्क पावसाच्या साचलेल्या पाण्यात तयार केला जात होता. पाणी साचले असतांना त्यात हाॅट मिक्स डांबर टाकून देण्यात आलं. रस्ते खराब असताना सामान्यांना त्याचा त्रास होत असतांना अशा प्रकारे करदात्यांचा पैशाचा चुराडा का करण्यात येतोय असा प्रश्न विचारण्यात येतोय. महापालिकेन माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती १) शहरात रोज खड्डे पडतात आणि रोज खड्ड्यांची दुरुस्ती होते. २) मनपाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, १ एप्रिल २०१४ ते १७ जून २०१७ या कालावधीत शहरात ४८ हजार २१७ खड्डे बुजवण्यात आले. ३) यात हॉटमिक्स प्लॅन्टद्वारे बुजविण्यात आलेल्या ३६ हजार ७८ तर जेटपॅचरद्वारे बुजविण्यात आलेल्या १२ हजार १३९ खड्ड्यांचा समावेश आहे. ४) शहरात रोज खड्डे पडतात आणि रोज दुरुस्ती होते. त्यामुळे खड्ड्यांची एकूण संख्येत माहिती देणे अशक्य असल्याचेमनपाच्या उत्तरात नमूद आहे. ५) १ जानेवारी ते १७ जून २०१७ या कालावधीत शहरामध्ये ३,२८१ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा मनपाने केला आहे. केवळ ४० टक्के निधी खर्च एप्रिल २०१४ पासून खड्डे बुजवण्यासाठी मिळालेल्या ५३ कोटींच्या निधीपैकी केवळ २१ कोटी ६० लाख म्हणजेच ४०.७५ टक्के रक्कमच खर्च करण्यात आल्याची बाब माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. हॉटमिक्स प्लॅन्ट’साठी २२ कोटी प्राप्त झाले होते. यापैकी केवळ ७ कोटी १५ लाख रुपयेच खर्च करण्यात आले, तर ‘जेटपॅचर’द्वारे खड्डे बुजविण्यासाठी ३१ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी केवळ १४ कोटी ४५ लाख रुपये खर्च करण्यात आले. शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे असताना उपलब्ध निधी पूर्ण खर्च का झाला नाही, हा एक यक्षप्रश्नच आहे.