आपल्या शरीरावर ऋतूनुसार होणाऱ्या वातावरणातील बदलांचा नक्कीच परिणाम होत असतो. आता नुकताच पावसाळा सुरू झाला आहे वातावरणातील सूर्याची उष्णता कमी होते आणि पाण्याचा अंश वाढत जातो. हवेत थंडावा वाढतो.
या कालावधीत शरीरातील वात वाढतो आणि पित्त जमा होण्यास सुरुवात होते. तसंच पचन शक्ती कमी होते. प्रतिकार शक्ती कमी आणि वातावरणातील जंतुसंसर्ग वाढल्याने आजार वाढतात.
या काळात आजारांपासून वाचण्यासाठी आहार हलका घ्यावा. ज्वारी, जव , नाचणी, गहू इ. धान्यांची भाकरी किंवा चपाती तुपाबरोबर घ्यावी.
दुधी, शिराळी, घोसाळी, पडवळ, कोहळा अशा वेलभाज्यांचा आहारात समावेश असावा.
चणा, वाटाणा, हरभरा, पावटा, राजमा इ. कडधान्यांचा वापर करू नये. मूग तसंच कमी प्रमाणात मटकी, मसूर, कुळीथ इ. कडधान्ये शरीरातील वात न वाढवता सहज पचतात.
फळांपैकी संत्री, मोसंबी, जांभूळ, सफरचंद, आंबा अशी गोड आंबट रसांची फळे दिवसा खावीत.
सकाळी ग्लासभर कोमट पाणी लिंबू पिळून प्यावं.
थंड पाणी पिऊ नये. दिवसभर उकळवून गार झालेलं किंवा कोमटच पाणी प्यावं. तसंच तुळशीपत्र टाकलेलं आणि तुरटी फिरवलेलं पाणी प्यावं.
नाश्ता किंवा जेवण भुकेनुसार घ्यावं.
फलाहार, दलिया तसंच भाज्यांचं सूप इ. सुंठ, आलं किंवा मिरी घालून घ्यावं.
आहारात गोड, कडू, हलके पदार्थ खावेत.
मुगाबरोबर किंवा जेष्ठमधाचे चूर्ण घालून दही घ्यावं.
ताकात सुंठ, जिरं, चिमूटभर मिरी घालून दुपारी प्यावं.
पुदिना, लसूण चटणीचा समावेश असावा.
रात्रीचं जेवण शक्य तेवढं लवकर घ्यावं. जेवणानंतर हरडे चूर्ण पाच ग्रॅम आणि सैंधव यांचं मिश्रण कोमट पाण्याबरोबर घ्यावं.
शरीरातील वात नियंत्रित ठेवण्यासाठी औषधी तेलाने मसाज करावा तसंच बस्तीसारख्या पंचकर्माची मदत घ्यावी.
आयुर्वेदातील आहार-विहार पालन आणि पंचकर्माच्या मदतीने शरीरातील दोषांचं नियंत्रण करून विविध आजारांपासून बचाव होईल आणि अखंड आरोग्य मिळेल, असं वेदिक्युर हेल्थकेअर अँड वेलनेसच्या आयुर्वेदाचार्य डॉ. वैशाली सावंत चव्हाण यांनी सांगितलं.