सूर नवा ध्यास नवा: अहमदनगरची सन्मिता धापटे-शिंदे ठरली महाराष्ट्राची महागायिका
कलर्स मराठी वाहिनीवरील 'सूर नवा ध्यास नवा- आशा उद्याची' या रिअॅलिटी शोचा अंतिम सोहळा 13 जूनला रविवारी पार पडला. यात विजेता (winner of sur nava dhyas nava) कोण ठरणार याकडेच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं.
या सोहळ्यात सन्मिता धापटे-शिंदे (Sanmita Dhapte Shinde) हिने बाजी मारली असून तिनं महागायिका होण्याचा मान पटकावला आहे.
रश्मी मोघे, राधा खुडे, प्रज्ञा साने, संपदा माने आणि श्रीनिधी देशपांडे या उत्तम गायनकौशल्य असणाऱ्या स्पर्धकांवर मात करत सन्मितानं महागायिका होण्याचा मान पटकावला आहे.
महागायिका ‘सन्मिता धापटे-शिंदे' आहे महाराष्ट्राची 'आशा उद्याची'. तिचे मनःपूर्वक अभिनंदन! अशी पोस्ट वाहिनीनं शेअर केली आहे.
संपूर्ण देशभरातून अनेक स्पर्धकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. मात्र, त्यापैकी केवळ 16 स्पर्धकच आपल्या गायनाच्या कौशल्यामुळे महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचले.
'सूर नवा ध्यास नवा'चं हे चौथ पर्व होतं आणि ते अधिकच खास ठरलं कारण यात फक्त गायिकांचाच समावेश होता.
अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या सहा गायिकांमध्ये अहमदनगरची सन्मिता धापटे-शिंदे, डोंबिवलीची प्रज्ञा साने, बारामतीची राधा खुडे, पुण्याच्या श्रीनिधी देशपांडे आणि रश्मी मोघे तर कोल्हापूरची संपदा माने यांचा समावेश होता.
या सर्वांमध्येच अगदी अटीतटीची स्पर्धा होती. मात्र, अहमदनगरच्या सन्मिता धापटे-शिंदे हिनं महाराष्ट्राची महागायिका होण्याचा मान पटकावला.