नागपूर,ता.19 जुलै : राज्यात सुरू असलेलं दूध बंद आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. सरकारनं संपूर्ण राज्यात दुधाला 25 रूपये दर जाहीर केला आहे हा दर सर्व दूध संघाला देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. 21 तारखेपासून शेतकऱ्यांना हा नवा दर मिळणार आहे. सरकारच्या या घोषणेमुळे आंदोलकांची मागणी पूर्ण झाली आहे. सोमवार पासून स्वाभिमानी संघटनेनं मुंबईचं दूध तोडण्यासाठी आंदोलन केलं होतं. सरकारच्या घोषणेनंतर राजू शेट्टी नागपूरात आले आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आणि सरकारच्या निर्णयाचं स्वागत करत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळं शुक्रवारपासून दूध पुरवढा सुरळीत होणार आहे. असा झाला निर्णय गेल्या 4 दिवसांपासून राज्यभर सुरू असलेली दूध कोंडी फुटली आहे. सरकारनं संपूर्ण राज्यात दुधाला 25 रूपये दर जाहीर केला आहे हा दर सर्व दूध संघाला देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. 21 तारखेपासून शेतकऱ्यांना हा नवा दर मिळणार आहे. सरकार पाच रूपयांचं अनुदान दूध संघाला देणार आहे. गुरूवारी नागपुरात विधानसभा अध्यक्षांच्या दालनात दूध दरवाढीसंदर्भात बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद सभापती आणि विरोधी पक्षनेते हजर होते. आतापर्यंत दूधासाठी शेतकऱ्यांना प्रतिलिटर 17 रूपये दर मिळत होता. तर दूध आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या राजू शेट्टींनी 5 रूपये अनुदानाची मागणी केली होती. मात्र सरकारनं 5 रूपये अनुदानाऐवजी दरात 8 रूपयांची वाढ केली आहे.