चेन्नई, 16 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात चेन्नईमध्ये सुरू असलेली दुसरी टेस्ट टीम इंडियानं 317 रननं दणदणीत जिंकली आहे. रोहित शर्माचे (Rohit Sharma) 161 रन, आर. अश्विनचा (R. Ashwin) ऑल राऊंड खेळ आणि भारतीय स्पिनर्सची कमाल हे भारताच्या या विजयाचं मुख्य वैशिष्ट्य होतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल गाठण्यासाठी भारताला ही टेस्ट जिंकणे आवश्यक होते. आता चार टेस्टच्या मालिकेत दोन्ही टीम 1-1 अशा बरोबरीत आहेत. भारतीय बॉलर्सची दमदार कामगिरी भारतीय बॉलर्सनं चौथ्या दिवसावर अगदी सुरुवातीपासून वर्चस्व गाजवलं. इंग्लंडनं 3 आऊट 53 या धावसंख्येवरुन पुढं खेळण्यास सुरुवात केली. आर. अश्विनच्या बॉलिंगवर डॅन लॉरेन्स लगेच आऊट झाला. ही विकेट अश्विनपेक्षा ऋषभ पंतची जास्त होती. महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईत पंतनं धोनीला साजेसी किपिंग करत लॉरेन्सला आऊट केलं. लॉरेन्स आऊट झाल्यानंतर जो रुटनं (Joe Root) बेन स्टोक्सच्या मदतीनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. बेन स्टोक्सला आर. अश्विननं पुन्हा एकदा जाळ्यात अडकवलं. स्टोक्सला अश्विननं दहाव्यांदा आऊट केलं आहे. लंचपूर्वी कुलदीप यादवनं बेन फोक्सला आऊट करत त्याची या टेस्टमधील पहिली विकेट घेतली.
लंचनंतर अक्षरची कमाल इंग्लंडची संपूर्ण भिस्त ही आता जो रुटवर होती. तिसऱ्या दिवशी लकी ठरलेला रुट पहिल्या सेशनमध्ये उभा होता. लंचनंतर तो फार टिकला नाही. अक्षर पटेलनं सलग दुसऱ्यांदा रुटला आऊट करत इंग्लंडच्या इनिंग लांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का दिला.
रुट आऊट झाल्यानंतर इंग्लंची इनिंग संपण्याची औपचारिकता बाकी होती. मोईन अलीनं पाच सिक्स मारत पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. कुलदीप यादवनं मोईन अलीला आऊट करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.