29 डिसेंबर : आदर्श घोटळ्यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते सामील आहेत. त्यामुळे विधानसभेत आदर्श घोटाळ्यावर चर्चा होणं गरजेच असून मीडियाच्या माध्यमातून सत्य बाहेर आलं पाहिजे, असं मत केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी मांडले आहे. आदर्श अहवालावरून राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांना सणसणीत चपराक लगावली असतानाच मिलिंद देवरा यांनी पुन्हा आदर्श घोटाळ्यावर भाष्य केलं आहे.
आदर्शचा अहवाल फेटाळण्याच्या निर्णयानंतर राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारवर चहुबाजूंनी टीका होत होती. या पार्श्वभूमीवर मिलिंद देवरा यांनी आदर्श अहवाल न दाबता त्यावर उत्तर द्यावं, अशा आशयाचं ट्विट केलं होतं. यानंतर आदर्शचा अहवाल फेटाळण्याच्या निर्णयाशी आपण सहमत नसल्याचे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल यांनी स्पष्ट केलं होतं.