29 डिसेंबर : सिंचन घोटाळ्यामुळे जेरीस आलेले राष्ट्रवादीचे नेते आदर्श चौकशी अहवालावरून काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीयत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय. आदर्शच्या अहवालाबद्दल निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठांशी चर्चा केली असणार, असं आम्हाला वाटलं होतं. पण, तसं दिसत नाही, असं अजित पवार यांनी जाहीर केलंय. आदर्शबद्दल काँग्रेस नेत्यांची वक्तव्यं बुचकळ्यात टाकणारी आहेत, असं म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा काँग्रेसला उघड पाडलंय. पण, त्याचवेळी आदर्शच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची विरोधकांची मागणी त्यांनी फेटाळलीय. सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही काँग्रेस नेत्यांवर पुन्हा एकदा टीका केलीय. आदर्श प्रकरणावरून काँग्रेस नेत्यांच्या परस्परविरोधी विधानांमुळे आघाडी सरकारच्या प्रतिमेवर परिणाम झाल्याचं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून एवढी टोलेबाजी होत असतानाही मुख्यमंत्री मौन सोडायला तयार नाही.