
13 फेब्रुवारी : निवडणुकीच्या तोंडावर कुणाला काय स्वप्नं पडतील याचा नेम नाही. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनाही आता गृहमंत्री बनण्याची स्वप्न पडू लागलीयेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर विधानसभेची निवडणूक लागू द्या, त्यानंतर राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता येईल, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि राज्याचा गृहमंत्री मीच असेन, असं शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी वक्तव्य केलं आहे. ते नाशिकमधील प्रचारसभेत बोलत होते.
एकदा की गृहमंत्री झालो की मुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपनं आयात केलेल्या सर्व गुंडांना तुरुंगात टाकणार, असा धमकीवजा इशारा रामदास कदम यांनी दिला. त्याचबरोबर, या निवडणुकीत भाजप, मनसे, राष्ट्रवादी यांच्या अस्थी रामकुंडात विसर्जित करणार असल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
याशिवाय त्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचं काय झालं हे सर्वांना माहीत आहे. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक हे सगळे गुल झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये मनसे आता औषधालाही शिल्लक राहणार नसल्याची टीकाही कदम यांनी केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv