06 जानेवारी : मुंबई विद्यापीठात पुन्हा एकदा वाद उफाळलेला आहे. एकीकडे विद्यापीठ निवडणुकीचा वाद गाजतोय. तर आता अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांना 4 जानेवारीला निलंबन करण्यात आल्यावरून वादाला तोंड फुटलंय. पण आपल्याऐवजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांचंच निलंबन व्हायला हवं होतं, असं मत हातेकर यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना व्यक्त केले आहे.
निलंबनाच्या कारवाईनंतर डॉ.हातेकर पहिल्यांदाच आयबीएन लोकमतशी बोलले. आपलं निलंबन सूडबुध्दीने झाल्याचा आरोपही त्यांनी केला. तसंच विद्यापीठाच्या या निलंबनाच्या कारवाईच्या विरोधात हायकोर्टात खटला दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितल आहे. दरम्यान डॉ. हातेकरांना सन्मानाने विद्यापीठात परत घेण्यात यावं यासाठी विविध डिपार्टमेंटचे विद्यार्थी विद्यापीठाच्या कलिना परिसरात निदर्शनं करत आहेत.