26 नोव्हेंबर : देशभरात गाजलेल्या आरुषी-हेमराज दुहेरी हत्याकांडाप्रकरणी आज साडे पाच वर्षांनंतर शिक्षा ठोठवण्यात आली. आरुषीचा खून तिच्याच आईवडिलांनी केला, हे सोमवारी कोर्टात सिद्ध झालं होतं. या दोघांना आज गाझियाबादच्या विशेष सीबीआय कोर्टाने जन्मठेपेची म्हणजे आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. परिस्थितीजन्य पुराव्यांवरून या दोघांना दोषी ठरवण्यात आलं असलं, तरी या हत्याकांडामागचा उद्देश काय होता, या प्रश्नाचं उत्तर मात्र निकालानंतरही अनुत्तरीतच राहिलंय. पाहूया याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट…
आरुषीच्या जन्मदात्यांनाच कोर्टाने तिच्या खुनासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 15 मे 2008 च्या रात्री नॉयडामधल्या तलवार कुटुंबाच्या बंगल्यात आरुषी आणि हेमराज या दोघांचा खून डॉ.राजेश आणि नुपूर तलवार यांनीच केल्याचं कोर्टात आधीच सिद्ध झालं होतं. हत्याकांडप्रकरणी राजेश आणि नुपूर तलवारना विशेष सीबीआय कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा ऐकताच तलवार पतीपत्नीला कोर्टात रडू कोसळलं. या शिक्षेवर समाधानी असल्याचं सीबीआयनं म्हटलंय.
कोर्टात युक्तिवाद सुरू होताच सीबीआयनं ही दुर्मिळातली दुर्मिळ घटना असल्याचं सांगत तलवार पतीपत्नीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच सीबीआयनं दोन वर्षांपूर्वी याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केला होता.
सोमवारी शिक्षा सुनावल्यानंतर राजेश आणि नुपूर तलवारची दासना जेलमधली रात्र खडतर गेली. जेलमध्ये तलवारांची रात्र झोपेशिवाय गेल्याची माहिती आहे. नुपूर तलवारला तर उच्च रक्तदाबाचा त्रासही झाल्यानं डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला.
तलावरांचे वकील आता या निकालाला अलाहाबाद हायकोर्टात आव्हान देणार आहेत. पण एक प्रश्नाचं उत्तर मात्र निकालानंतरही मिळालेलं नाहीय. अखेर तलवार पतीपत्नीनी आपल्या मुलीचीच हत्या करण्याएवढं टोकाचं पाऊल उचलण्यामागचा हेतू काय होता? अशी सुनावली शिक्षा
आरूषी हत्याकांड निकाल