शिवसेनेत चाललंय काय ?
मुंबई 19 जून : शिवसेना आज 47 व्या वर्षात पदार्पण करतेय. आज सालाबाद प्रमाणं मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा मेळावा पार पडतोय. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. 47 व्या वर्षात पदार्पण करताना शिवसेनेसमोर कधी नव्हेत इतकी आव्हानंही आहेत.
गेली सेहेचाळीस वर्ष ज्या बाळासाहेबांच्या नावाने शिवसेना ओळखली गेली, त्या बाळासाहेबांच्या निधनानंतर आज शिवसेनेचा पहिलाच वर्धापन दिन आहे. बाळासाहेबांच्या गैरहजेरीत आज उद्धव ठाकरे नेमके काय बोलताहेत त्याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलंय. कारण गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या मुद्द्यांवर शिवसेनेने घेतलेली धरसोडीची भूमिका आणि त्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेने शिवसैनिक भांबावून गेलाय.
काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकांच्या आढावा बैठका दरम्यान सुभाष देसाई आणि लीलाधर डाकेंव्यतिरिक्त इतर कोणत्याही नेत्यांना विश्वासात न घेतल्याने काही प्रमुख नेते नाराज आहेत. त्याचबरोबर दुष्काळ, महागाई, भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवर सत्ताधार्यांवर इतर विरोधक तुटून पडत असताना उद्धव ठाकरे मात्र सुट्या घालवायला परदेशी गेले होते. शिवसेनेसाठी लाठ्या खाललेल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना सार्वजनिक ठिकाणी भाष्य करण्यासाठीही उद्धव ठाकरेंच्या जनसंपर्क प्रमुखांमार्फत उद्धव ठाकरेंची परवानगी घ्यावी लागते. या सगळ्या कार्यपद्धतीमुळे अनेक ज्येष्ठ नेते नाराज आहेत. कामगार दिनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात रामदास कदम यांनी आपल्या रागाला वाट करुन दिली.
बाळासाहेबांची शिवसेना आणि सध्याची शिवसेना यात जमीन आस्मानाचं अंतर असल्याचं मत शिवसेना नेते खासगीत व्यक्त करतात. ही सगळी परिस्थिती एक प्रकारे शिवसेनेसाठी धोक्याची घंटा असल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.त्यामुळे सत्तेचाळीसाव्या वर्षात उद्धव ठाकरेंसमोर पक्षांतर्गत नाराजी दूर करून प्रमुख विरोधी पक्ष हे पद कायम राखण्याचं मोठं आव्हान असेल.