10 मार्च : महायुती आणि पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना राज ठाकरे यांच्या पाठिंब्याची गरज नाही अशी तोफ आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी डागली आहे. राज ठाकरे हे शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही आठवले यांनी केला.
लोकसभा निवडणुकीचा प्रचाराला रंग चढू लागलाय. उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. अशा परिस्थितीतच राज्यातलं राजकीय चित्र आणखीच रंगतदार होऊ लागलंय. विशेषतः मनसे आणि महायुतीचे संबंध हा सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरलाय. रविवारीच मनसेचा आठव्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा जाहीर केला.
मात्र, महायुती आणि नरेंद्र मोदींना राजच्या पाठिंब्याची गरज नाही अशी टीका आठवले यांनी डागलीये. राज ठाकरे हे सेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही आठवले यांनी केला. अलीकडे नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे शिवसेनेनं तीव्र नाराजी व्यक्त केली होती. रविवारी राज यांनी लोकसभेसाठी सात उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत एकाच दगडात दोन पक्षी मारले. यादी तर जाहीर केली पण मोदींना पाठिंबाही जाहीर केला. तर दुसरी बाजू म्हणजे सात पैकी सहा उमेदवार हे सेनेच्या विरोधात आहे. त्यामुळे सेनेच्या गोटात आणखी अस्वस्थता पसरलीय. त्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांच्या टीकेला आणखी महत्त्व मिळतंय.