21 मार्च : शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय. आणि यावेळी कारण आहे ते शिवसेनेच्या उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवण्याचं. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 20 जागा लढवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलाय. त्याचबरोबर बिहार आणि दिल्लीमध्येही शिवसेना उमेदवार उभे करणार आहे. आणि याचा फटका भाजपला बसू शकतो.
भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये काही आलबेल नाही हे गेल्या काही दिवसांतल्या घडामोडींवरून अगदी स्पष्ट दिसतंय. आधी नितीन गडकरी आणि राज ठाकरेंच्या भेटीवरून वादळ माजलं. आणि आता नरेंद्र मोदींविरोधात उमेदवार उभा करण्याचा पवित्रा शिवसेनेनं घेतला त्यावरून वादंग सुरू झाला. मोदींविरोधात वाराणसीमधून उमेदवार उभं करणार, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एनआयया वृत्तसंस्थेशी बोलताना केलं. राऊत यांच्या या प्रतिक्रियेवर देशभर पडसाद उमटले. आणि मग अखेर आदित्य ठाकरेंना टिवटरच्या माध्यमातून, आग विझवण्याचा प्रयत्न करावा लागला. “आमच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या विरोधात आम्ही उमेदवार देणार नाही, या अफवा आहेत,आम्ही अर्थातच वाराणसी, लखनौमधून लढणार नाही " असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं. पण लखनौ आणि वाराणसी सोडून उत्तर प्रदेशमध्ये 20 जागांवर आपण उमेदवार देणार आहोत यावर शिवसेना ठाम राहिली. त्याचबरोबर शिवसेना बिहारमध्ये 7 जागांवर आणि दिल्लीमध्ये 5 जागांवर निवडणूक लढणार आहे. या सगळ्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनाही संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घेणारं वक्तव्य करावं लागलं . हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमची युती अभेद्य आहे, अशी सारवासारव शिवसेना भाजपच्या नेत्यांकडून केली जाते. पण निवडणुकीच्या तोंडावर हे स्पष्टीकरण देण्याची वेळ या नेत्यांवर वारंवार येते .यावरूनच दिसतंय. शिवसेना आणि भाजपमधलं भांडण मिटण्याची काही चिन्हं नाहीत.