24 सप्टेंबर : अजमल कसाब आणि अफजल गुरूला फासावर लटकवल्यानंतर मुंबईत दहशतवादी कारवायाची भीती व्यक्त केली जात होती. आता मात्र अटकेत असलेला इंडियन मुजाहिद्दीनचा मोरक्या यासीन भटकळने मुंबईत 12 ठिकाणी दहशतवाद्यांनी रेकी केल्याचा धक्कादायक खुलासा केलाय. यात मुंबईतल्या ज्यू धर्मीयांच्या स्थळ सॉफ्ट टार्गेट असल्याचंही त्याने सांगितलं. त्याच्या या माहितीमुळे मुंबईतील ज्यूंच्या स्थळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईतल्या अशा एकूण 12 स्थळांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षेची सर्व खबरदारी घेण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहे. तसंच ज्यू धर्मीयांच्या संस्थांनी सुरक्षा गार्ड नेमावे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, येणार्या-जाणार्यांना आयकार्ड बंधनकारक करणं आणि इमारतीबाहेर कुणालाही गाडी पार्क करू देऊ नये, असे आदेश देण्यात आले आहे. खबरदारीचे उपाय म्हणून भायखळा भागातल्या एटीएस ऑफिसजवळच्या एका ज्यू शाळेबाहेर सुरक्षा गार्ड तैनात करण्यात आले आहे. ज्यू धर्मीयांचे स्थळ या अगोदरही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिले आहे. 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी नरीमन पाँईंट येथील ज्यूंच्या आबाद हाऊसवर हल्ला केला होता त्यामुळे सुरक्षेत अधिक वाढ करण्यात आलीय.