इंदौर, 30 जानेवारी : इंदौर (Indore) हे आहे देशातील सर्वात स्वच्छ शहर. मात्र इंदौर महापालिका कर्मचारी स्वच्छतेच्या नावावर माणुसकी विसरले आहेत. इंदौरमध्ये घडलेल्या क्रूर घटनेचा एक व्हीडिओ व्हायरल (viral video) झाला आहे. भीक मागून जगणाऱ्या वृद्ध व्यक्तींना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी (municipal corporation)एका गाडीत कोंबलं आणि दुसऱ्याच जागेवर नेऊन सोडलं. या व्यक्तींना गाडीत चढवता-उतरवताना त्यांच्या आरोग्याच्या स्थितीचाही अजिबात विचार केला गेला नाही. या घटनेनंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (CM Shivraj Singh Chauhan) यांच्या आदेशावरून तीन व्यक्तींना निलंबित करण्यात आलं आहे. याबाबतचा व्हीडिओ शुक्रवारी व्हायरल झाला. इंदौर महापालिकेची एक गाडी घरदार नसलेल्या वृद्धांना शहराबाहेर सोडायला आली होती. मात्र कर्मचाऱ्यांचा हेतू कळताच तिथं उपस्थित लोकांनी विरोध केला. मग हीच गाडी या वृद्धांना आल्यापावली परत घेऊन गेली. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही याबाबतचा व्हीडिओ ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.
इंदौर नगरपालिकेचा ट्रक काही निराधार आणि वृद्ध व्यक्तींना घेऊन शहराबाहेर देवास हायवेवर पोचला. इथं नगरपालिकेचे कर्मचारी या वृद्धांना गाडीतून खाली उतरवू लागले. यावेळी काही स्थानिकांनी या कर्मचाऱ्यांना विचारणा केली, की इथं या लोकांना तुम्ही का सोडत आहात? यावेळी कर्मचाऱ्यांना निरुत्तर व्हावे लागले. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर उपायुक्त प्रताप सोलंकी यांच्यासह इतर दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं.