उत्तरप्रदेश, 05 नोव्हेंबर : टी-१ अर्थात अवनी वाघिणीची हत्या केल्याची घटना ताजी असताना उत्तरप्रदेशमध्ये एका वाघिणीची निर्दयपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. गावकऱ्यांनी या वाघिणीला लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण करून ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारले. लखीमपूर जिल्ह्यातील दुधवा व्याघ्र प्रकल्पातील किशनपूर वनक्षेत्रात ही घटना घडली. दुधवा येथील उपविभागीय अधिकारी महावीर कौजलगी यांनी सांगितलं की, या भागात एका वाघिणीने चलतुआ गावात देवानंद (वय ५०) नावाच्या व्यक्तीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात देवानंद गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेनंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी रविवारी जंगलात वाघिणीला घेराव घालून लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण केली. गावकरी एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी या वाघिणीला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारले. वाघिणीचा मृतदेह वन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाॅलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या वाघिणीच्या हत्येबद्दल टि्वटकरून दुख व्यक्त केलं.
दुधवा क्षेत्रातील अधिकारी रमेश कुमार पांडेय यांनी या घटनेची गंभीरतेनं दखल घेतली असून वाघासारखा वन्य प्राण्याची हत्या करणे गंभीर घटना आहे. या प्रकरणी कडक कारवाई केली जाईल अशी माहिती दिली. ===================================