नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) पंजाबच्या होशियारपुर आणि राजस्थानमध्ये झालेल्या घटनांबाबत भाजपने उपस्थित केलेल्या प्रश्नांचं उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, या राज्यांनी उत्तर प्रदेशप्रमाणे बलात्काराची घटना नाकारली नाही. राहुल गांधींनी पुढे लिहिलं आहे की, जर त्या राज्यांनी न्याय दिला नाही तर मी तेथेही जाईन. भाजपने (BJP) पंजाबमधील (Punjab) होशियारपुर जिल्ह्यातील सहा वर्षांच्या दलित मुलीवरील दुष्कृत्य आणि हत्याच्या घटनेवरुन काँग्रेसला घेरलं आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हे प्रकरणात अत्यंत धक्कादायक असल्याचे मत व्यक्त केले. सोबतच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजकारणासाठी रॅली करण्यापेक्षा पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घ्यायला हवी. उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले होते. शनिवारी त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी जावडेकर यांना उत्तर देत लिहिलं की, उत्तर प्रदेशप्रमाणे पंजाब आणि राजस्थानच्या सरकारने मुलीवर बलात्कार झाल्याची बाब नाकारली नाही. पीडितेच्या कुटुंबाला धमकावण्यातही आलं नव्हतं. जर त्यांनी असं केलं तर मी तेथेही न्यायासाठी लढेन.
यापूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह म्हणाले होते की, भाजप करीत असलेला दावा चुकीचा आहे. होशियारपूरमधील घटना आणि हाथरसमधील घटनेची तुलना होऊ शकत नाही. ते म्हणाले की, हाथरस प्रकरणात उत्तर प्रदेश सरकार आणि पोलीस यांनी कडक कारवाई केली नाही आणि वरच्या जातीच्या आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.