मुंबई, 17 जून : मोदी सरकारनं भारतीय लष्करातील भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme Protest) देशातील अनेक राज्यांमधून विरोध होत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये या योजनेला सर्वाधिक विरोध होत आहे. आंदोलकांनी ही योजना मागे घेण्याची मागणी केली आहे. या योजनेला होणारा वाढता विरोध लक्षात घेऊन सरकारनं यासाठीच्या वयोमर्यादेत 21 वरून 23 पर्यंत वाढवली आहे. त्यानंतरही हा विरोध सुरूच आहे. बिहारमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. बिहारच्या उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या घरावर आंदोलकांनी हल्ला केलाय. त्याचबरोबर बिहार भाजपा अध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या घरावरही हल्ला झालाय. जयस्वाल यांच्या घरावर गोळीबार देखील करण्यात आलाय. या आंदोलनामुळे बिहारमधील 55 पॅसेंजर ट्रेन रद्द करण्यात आल्या असून 100 रेल्वेचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
या आंदोलनाचा लोण दक्षिण भारतामध्येही पोहचलं आहे. हैदराबादमध्ये आंदोलकांनी या योजनेला विरोध केला. शेकडो तरूणांच्या जमावानं सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर हल्ला केला. त्यांनी यावेळी दगडफेक करत रेल्वेच्या दोन डब्यांना आग लावली. या आंदोलनात रेल्वेच्या संपत्तीचं मोठं नुकसान झालं आहे. VIDEO : अग्निपथ योजनेच्या विरोधकांनी लावली रेल्वेला आग, स्टेशनवरील स्टॉलही लुटला दरम्यान, केंद्र सरकारने आता तरुणांचा राग शांत करण्यासाठी भरतीच्या वयोमर्यादेत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही सवलत केवळ एक वेळसाठी असेल आणि त्यानंतर अग्निपथ योजनेच्या वयोमर्यादेनुसार भरती होईल. सध्या, नवीन अग्निपथ योजनेत भरतीसाठी सरकारने वयोमर्यादा 17.5 वर्षे ते 21 वर्षे निश्चित केली आहे. परंतु लवकरच सुरू होणाऱ्या तीन सेवांच्या पहिल्या भरतीमध्ये 23 वर्षांपर्यंतचे तरुणही अर्ज करू शकतील.