नवी दिल्ली, 29 जानेवारी : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये (Farmers Protest) पुन्हा एकदा हिंसाचार झाला आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिक शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी घोषणाबाजीला सुरूवात केली. शेतकऱ्यांनी सिंघू बॉर्डर खाली करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली. शेतकरी आंदोलनामुळे आमचा व्यवसाय ठप्प झाला आहे, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. 1.45 च्या सुमारास स्थानिक शेतकऱ्यांच्या तंबूजवळ गेले आणि त्यांचं सामान तोडायला सुरूवात केली. यानंतर शेतकरी आणि स्थानिकांमध्ये हाणामारीला सुरूवात झाली, ज्यात दगडफेकही करण्यात आली.
पोलिसांनी दोन्ही बाजूंना रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अखेर लाठीचार्ज करावा लागला आणि अश्रूधुराचा वापरही करावा लागला. या झटापटीमध्ये अनेकांना दुखापत झाली आहे. काही पोलिसाही यात गंभीर जखमी झाले आहेत. एका पोलिसावर तलवारीने हल्ला झाल्याचीही माहिती आहे. याआधी किसान मजदूर संघर्ष समितीचे नेते सतनाम सिंह पन्नू यांनी आरोप केला की, ‘केंद्र सरकार RSS च्या लोकांना पाठवून शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणचा वातावरण खराब करत आहेत. काल त्यांनी दोनवेळा असं केलं, पण जोपर्यंत कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आम्ही परत जाणार नाही.’ दुसरीकडे सिंघू बॉर्डरवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आंदोलनाच्या ठिकाणी चारही बाजूंनी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. तर टीकरी बॉर्डरवरही चोख बंदोबस्त आहे, कारण या दोन्ही बॉर्डर शेतकरी आंदोलनाची केंद्र आहेत. मुझफ्फरनगरमध्ये किसान महापंचायत ट्रॅक्टर रॅलीमधल्या हिंसेनंतर मागचे दोन दिवस पोलीस ऍक्शनमध्ये होते. त्यामुळे गाजीपूर बॉर्डरवरचं आंदोलन संपेल, असं वाटत होतं. पण भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांच्या भावनिक आवाहनानंतर आंदोलन आणखी तीव्र झालं आहे. त्यामुळे मुजफ्परनगरमध्ये महापंचायत बोलावण्यात आली आहे. गाजीपूर बॉर्डरवर हालचाल वाढली शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आरएलडीचे नेते जयंत चौधरी टिकैत यांना भेटण्यासाठी गाजीपूर बॉर्डरवर गेले. तर आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही गाजीपूर बॉर्डरवर जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या.