कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus)) दहशतीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलासादायक अशी बातमी दिली आहे.
देशातील 2546 कोरोना रुग्ण बरे झालेत. यामुळे कोरोनावर मात देणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढून आता 14.75 टक्के झालं आहे.
देशातील 736 पैकी 411 जिल्हे असे आहेत, जिथं रविवारपर्यंत एकही नवं प्रकरण समोर आलं नाही. याचा अर्थ निम्म्या देशामध्ये कोरोनाचं एकही प्रकरण नाही.
23 राज्यांतील 59 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत, तर 3 राज्यातील 3 जिल्ह्यांमध्ये 28 दिवसांत कोरोनाचं एकही प्रकरण नाही.
राजस्थानमधील भीलवाडा कोरोनाव्हायरसचं हॉटस्पॉट होतं. मात्र प्रशासनाने उचलेल्या पावलांमुळे आता भीलवाडा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे आणि एकही नवं प्रकरण नाही.
भीलवाडाप्रमाणे गोवाही कोरोनामुक्त झालं आहे. राज्यात कोरोनाची 7 प्रकरणं होती, ज्यापैकी 6 सुरुवातीला बरे झाले, तर शेवटच्या रुग्णालाही रविवारी डिस्चार्ज मिळाला.
उत्तर प्रदेशातही बहुतेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी होतो आहे. पीलीभीत, महाराजगंज आणि हाथरस हे जिल्हे कोरोना मुक्त आहेत. इथले सर्व रुग्ण बरे होऊन घरी गेलेत.
लॉकडाऊनपूर्वी कोरोना रुग्णांची संख्या 3.5 दिवसांत दुप्पट होत होती. मात्र आता 7.5 दिवसांनी दुप्पट होते आहे. 19 राज्यांमध्ये तर यापेक्षा जास्त दिवस लागतात. यामध्ये केरळ, आसाम, तामिळनाडू, पंजाब, यूपी, हरयाणा, लडाख, दिल्ली, चंदीगडचा समावेश आहे.
कोरोनाव्हायरसशी सर्वात चांगल्या पद्धतीने लढा देणाऱ्यांमध्ये भारतातील केरळ राज्याचं नाव आहे. कारण इथं कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 56.3 टक्के आहे, जे इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात चांगलं आहे.
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या कोरोना टेस्टिंगची क्षमता गेल्या काही दिवसात वाढत आहे. सध्या दिवसाला 37 हजार टेस्ट होतात, ज्या आता 80 हजार करण्याची योजना आहे, असं सरकारनं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.